हद्दवाढीलाच प्राधान्य
By Admin | Updated: September 4, 2016 01:22 IST2016-09-04T01:16:06+5:302016-09-04T01:22:16+5:30
कृती समितीचा निर्णय : गणेशोत्सवानंतर प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा बैठकीत इशारा

हद्दवाढीलाच प्राधान्य
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला प्राधान्य देण्याचा आणि प्राधिकरणामुळे शहर, ग्रामीण विकास करताना महापालिकेची स्वायत्तता अबाधित राहणार असेल व भविष्यात हद्दवाढीची लेखी हमी दिल्यास प्राधिकरणाबाबत सकारात्मक विचार करण्याचा निर्णय महापालिकेत शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत झाला.
हद्दवाढीऐवजी प्राधिकरणाच्या शासनाने ठेवलेल्या पर्यायाबाबतची सविस्तर माहिती या बैठकीत दिली. गणेशोत्सवानंतर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलाविलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करू. प्राधिकरणाबाबत उपसमिती नेमून अभ्यास करू व नंतर प्राधिकरणाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अन्यथा रस्त्यावर उतरून विरोध करू, असा निर्णयही घेण्यात आला.
या बैठकीत, हद्दवाढीला विरोध करणाऱ्या नेत्यांचा निषेध केला. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली, तर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार हेही उपस्थित होते. बैठकीत, प्रवीण केसरकर, भाजपचे विजयराव सूर्यवंशी, बाबा पार्टे, भूपाल शेटे, अजित ठाणेकर, अशोक जाधव, सतीशचंद्र कांबळे, किशोर घाटगे, गणी आजरेकर, संपत चव्हाण, अमोल माने, अॅड. पंडित सडोलीकर, महंमद शेख, आदींनी चर्चेत सहभाग घेतला. स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, मारुतराव कातवरे, विक्रम जरग, जयवंत हारुगले, सुनील जाधव, माधुरी लाड, उमा बनछोडे, शोभा कवाळे, अनिता महादेव टिपुगडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
निमंत्रकांचा आक्षेप : भाजपचा पाठिंबा
भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, प्राधिकरण हे हद्दवाढीचे पहिले पाऊल असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे प्राधिकरणास भाजपचा पाठिंबा राहील. प्राधिकरणाचा अभ्यास करून मत तयार करावे असेही त्यांनी सुचविले. त्यावर निमंत्रक आर. के. पोवार यांनी आक्षेप घेत ही बैठक पक्षाची नव्हे, कृती समितीची आहे; त्यामुळे भाजपने स्वतंत्र निर्णय घेऊ नये, असे सांगितले. त्यावर विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, महेश जाधव यांनी आक्षेप घेतला. ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्यास कमी पडल्याचे मान्य करावे, असे त्यांनी सांगितले
प्राधिकरणाचा अभ्यास करू : रामाणे
हद्दवाढ ही आपली मागणी ठामपणे रेटू; तरीही प्राधिकरणाचा अभ्यास करून मुख्यमंत्र्यांसोेबत पुन्हा होणाऱ्या बैठकीनंतर प्राधिकरणाबाबत निर्णय घेऊ, असे महापौर आश्विनी रामाणे सांगितले.
सतेज यांचा विरोध नाही : चव्हाण
हद्दवाढीबाबतच्या आंदोलनात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यासह खासदार संभाजीराजे, धनंजय महाडिक यांनीही आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी बैठकीत झाली. यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी हद्दवाढीला आमदार सतेज पाटील यांनी विरोध केलेला नाही, असा खुलासा केला.
गणेशोत्सवात ‘हद्दवाढी’चे फलक
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी मंडपाबाहेर ‘हद्दवाढ हवीच’ असे फलक लावण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी सुचविले. आमदार क्षीरसागर यांनी, असे १५०० फलक मंडळांसाठी देणार असल्याचे सांगितले.
चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन
महापौर अश्विनी रामाणे यांनी, पालकमंत्री पाटील हे हद्दवाढीबाबत सकारात्मक आहेत असे सांगितले. तीन आमदारांच्या विरोधामुळे शासनाने निर्णय बदलला असून, पालकमंत्री पाटील यांनी हद्दवाढ होण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी संदीप देसाई, महेश जाधव, विजयराव सूर्यवंशी यांनीही पालकमंत्री पाटील यांचे अभिनंदन केले.
मेरिट कुठे गेले? : क्षीरसागर
मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पाटील यांनी मेरिटवर निर्णय घेणार म्हणून सांगितले. ते कुठे गेले, असा सवाल करत आमदार क्षीरसागर यांनी ‘केएमआरडी’ची मागणी वर्षापूर्वी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आठवड्यानंतर पुन्हा चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. त्यावेळीही हद्दवाढीलाच प्राधान्य असेल; पण प्राधिकरणही समजावून घेऊ. महापालिकेची स्वायत्तता अबाधित ठेवून शहर व ग्रामीणचा विकास होत असेल तर प्राधिकरणाचा सकारात्मक विचार करू, असेही क्षीरसागर म्हणाले.