‘सनातन’च्या पनवेल आश्रमावर छापा
By Admin | Updated: September 6, 2016 01:15 IST2016-09-06T01:14:56+5:302016-09-06T01:15:11+5:30
तावडेच्या घराचीही झडती : महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा

‘सनातन’च्या पनवेल आश्रमावर छापा
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’च्या चार पथकांनी सोमवारी हिंदू जनजागरण समितीच्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (वय ४८) याच्या पनवेल-पाली-सुखापूर येथील ‘सनातन’चा आश्रम आणि तावडेच्या निवासस्थानी छापे टाकले. सकाळी अकरा वाजता सुरू झालेले झडतीसत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
‘एसआयटी’कडे तावडेच्या बाबतीत काही ठोस पुरावे मिळाले होते. त्यासाठी त्याच्या संकुलाची झडती घेणे तपासकामाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. झडतीमध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा ‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
पानसरे हत्येप्रकरणी तावडेला सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. शुक्रवार (दि. २) पासून तावडेकडे चौकशी सुरू आहे.
कसबा बावडा पोलिस लाईन येथील बॉम्बशोध पथकाच्या कक्षाशेजारील बरॅकमध्ये त्याला दिवसभर ठेवले जाते. त्यानंतर रात्री राजारामपुरीच्या कोठडीत रवानगी केली जाते. गेल्या दोन दिवसांच्या चौकशीमध्ये विचारलेल्या प्रश्नांना बगल देत त्याने तपासकामात असहकार्य केले.
रविवारी रात्री चार पथके त्याला पनवेलला घेऊन गेली. त्याचे वास्तव्य असलेल्या पनवेल-पाली-सुखापूर येथील सनातनचा आश्रम आणि तावडेच्या निवासस्थानावर छापे टाकले. महत्त्वाची कागदपत्रे, अग्निशस्त्रे व काडतुसे हाती लागतात काय? यासाठी पथकाने कसून शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत झडतीसत्र सुरू होते. झडतीमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, ‘सीबीआय’ने १ जून २०१६ रोजी सकाळी साडेआठ वाजता न्यायालयाच्या परवानगीने पनवेल येथील डॉ. तावडेच्या घरी छापा टाकला.
यावेळी ‘सीबीआय’ यंत्रणेच्या हाती डायरी, नोटबुक, दोन फोन व त्यांचे कव्हर या व्यतिरिक्त काही लागले नाही. त्यानंतर ‘एसआयटी’ने टाकलेल्या छाप्यात असे काय मिळाले आहे, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
तावडे हा प्रचंड हुशार आहे. त्याचे वय, शारीरिक व मानसिक स्थिती पाहून त्याच्याकडे चौकशी केली जाते. तो पोलिसांपासून काय लपवितो, काय सांगतो हे पाहून त्याच्याकडून मिळालेल्या प्रत्येक माहितीची खातरजमा केली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
घटनास्थळांचा पंचनामा
डॉ. तावडे हा हिंदू जनजागरण समिती व सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक आहे. या संस्थेत तो कोणत्या उंचीवर होता. वैद्यकीय सेवा किती वेळ व संस्थेच्या कामाला किती वेळ द्यायचा, ही माहिती घेतली जात आहे.
त्याच्या कोल्हापुरातील वास्तव्यादरम्यान सन २००१ ते २००६ या कालावधीत त्याने विविध हिंदुत्ववादी कार्यक्रमांत सहभाग घेऊन पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्यासारखा डाव्या व पुरोगामी विचारसरणीच्या विचारवंतांना थेट विरोध केला होता.
तो काही वर्षे गंगावेश येथे खासगी वैद्यकीय सेवा देत होता. या संपूर्ण घटनांची त्याला आठवण होते. त्यामुळे या घटनास्थळांचाही पंचनामा तावडेच्या समोर केला जाणार आहे.
पोलिसांना नोटीस : तावडेची चौकशी आमच्यासमोर व्हावी, असा विनंती अर्ज आरोपीचे वकील समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे केला होता. न्यायालयाने त्यास परवानगी दिली होती. त्यानुसार अॅड. इचलकरंजीकर यांनी रविवारी पोलिस मुख्यालयात येऊन तपास अधिकारी सुहेल शर्मा यांना फोन केला. त्यांनी बोलावितो, असे सांगून फोन बंद केला; पण त्यांना कोणताही निरोप दिला नाही. अॅड. इचलकरंजीकर दिवसभर तेथे ताटकळत बसले होते. पोलिस रात्री बोलावतील, या आशेने ते कोल्हापुरात उशिरापर्यंत थांबून राहिले. सोमवारी त्यांनी सुहेल शर्मा यांना मला तुम्ही भेटू देत नाही, तुमची वेळ सांगा, त्याप्रमाणे मी येईन, असे कळविले. त्यालाही त्यांनी उत्तर दिले नाही. पोलिसांची ही वागणूक त्यांनी एका अर्जाद्वारे सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणली. न्यायालयाने पोलिसांना नोटीस काढून यासंबंधी उत्तर देण्याचे आदेश दिले.
मडगाव-गोवा आश्रमावरही छाप्याची तयारी
तावडे हा मडगाव-गोवा येथे सन २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रूद्रगौंडा पाटील, सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे यांच्या संपर्कात असल्याचे ‘एसआयटी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. तो तेथील आश्रमामध्येही काही काळ वास्तव्यास होता. त्यामुळे त्या आश्रमावरही छापा टाकला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
मडगाव-गोवा आश्रमावरही छाप्याची तयारी
तावडे हा मडगाव-गोवा येथे सन २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रूद्रगौंडा पाटील, सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे यांच्या संपर्कात असल्याचे ‘एसआयटी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. तो तेथील आश्रमामध्येही काही काळ वास्तव्यास होता. त्यामुळे त्या आश्रमावरही छापा टाकला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
तावडेचे भूमिगत विनय पवारशी घनिष्ठ संबंध
तसेच भूमिगत असणारा ‘सनातन’चा साधक विनय बाबूराव पवार याच्यावर भारतात कुठेही गुन्हा दाखल नाही, असे असतानाही तो भूमिगत आहे. विनय व श्रद्धा पवार यांचे लग्नही आश्रमात झाले आहे. त्याचे मूळ गाव उंब्रज (जि. सातारा). त्याचे आई-वडील घरदार सोडून आश्रमात राहण्यास निघाले आहेत. विनय पवार याच्याशी तावडेचा अलीकडच्या काळात संपर्क आल्याचे पुढे आले आहे. दोघांचेही घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या दोघांचा पानसरे यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे काय, याची खात्री केली जात आहे.