प्राथमिक शिक्षकांची धावाधाव
By Admin | Updated: May 27, 2015 00:59 IST2015-05-27T00:39:36+5:302015-05-27T00:59:17+5:30
सोई सवलती देण्याची तयारी : पटसंख्या टिकविण्यासाठी विद्यार्थी शोध सुरू

प्राथमिक शिक्षकांची धावाधाव
घन:शाम कुंभार - यड्राव -ग्रामीण भागातील पालकांचा कल खासगी शाळेत मुलांना पाठविण्याकडे असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या कमी पडत आहे; तर पटाअभावी बदलीची जोखीम शिक्षकांवर आल्याने नव्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने सोई सवलती देण्याची तयारी शिक्षकांनी केली असली तरी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेची गुणवैशिष्ट्ये व गुणवत्ता असलेले डिजिटल फलक शाळेच्या भिंतीवर लागले आहेत.
खासगी शाळा, तेथील आकर्षक परिसर, गणवेश, घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत असणारी बससेवा, इंग्रजी माध्यमाचे शिक्षण यासह शेजारचा मुलगा अशा शाळेत जातो म्हटल्यावर आपले पाल्य तिथे शिक्षण घ्यावी, ही भावना ग्रामीण भागासह सर्वत्र रूढ होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकही याकडे आकर्षिक होत आहेत.
याचा परिणाम शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या घटण्यामध्ये होत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी झाली, तर सध्या ज्या शाळेत शिक्षण देण्याचे काम शिक्षकांकडून होते, तेथील शिक्षक संख्या नियमाप्रमाणे कमी होईल व त्यांना अन्यत्र जावे लागेल.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास महिनाभर अवधी असला तरी शिक्षकमंडळी सुटीचा आनंद घेण्याऐवजी नवे विद्यार्थी शोधण्याची मोहीम सुरू करून त्यांच्या पालकांना आपल्या शाळांचे महत्त्व व वैशिष्ट्ये पटवून देत आहेत; तर शहर परिसरातील खासगी शाळांसह, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलकडून आपल्या संस्थेची गुणवत्ता, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, विविध स्पर्धांतील यशस्वीतांचे फोटो व सेवा-सुविधांची माहिती असणारे डिजिटल फलक आपापल्या इमारतींवर झळकवले जात आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मात्र धावाधाव करावी लागत आहे. पटसंख्या टिकविण्यासाठी त्यांना विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तयार करण्यासाठी शिक्षकांना परीक्षा द्यावी लागत आहे.
विविध सोयींची सवलत
शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढावी, नवे विद्यार्थी आपल्या शाळेकडे कसे आकर्षित होतील, याकरिता शिक्षकांनी संयुक्तपणे स्वजबाबदारीवर विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, आकर्षक गणवेशासाठी प्रयत्न, बैठकीसाठी बेंचेसची देणगीद्वारे उपलब्धता, जादा अंतरावरील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनाची सोय, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहनाबरोबरच त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये, याचीही खबरदारी घेतली जात आहे.