देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: September 8, 2016 00:26 IST2016-09-08T00:12:44+5:302016-09-08T00:26:40+5:30

राजारामपुरी, उद्यमनगरात तांत्रिक देखावे : युवक मित्र मंडळाची प्लास्टिकच्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती

Preparation of the scene in the final stage | देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून संशोधक या कचऱ्यापासून इंधननिर्मितीचा प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयोग पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून डॉ. मेधा ताडपत्रीकर व शिरीष फडतरे यांनी शोधला आहे. या प्रयोगाचे सादरीकरण गणेशोत्सवानिमित्त राजारामपुरी अकरावी गल्ली येथील युवक मित्र मंडळाने सादर केले आहे.
एव्हरेस्ट असो वा कुंभमेळा, कन्यागत महापर्व; सगळीकडे एकच समस्या, ती म्हणजे प्लास्टिक कचरा होय. आता तुम्ही म्हणाल, यात नवीन काय आहे? प्लास्टिक कचरा कायम होतच राहणार आहे. मात्र, प्लास्टिक १००० वर्षे तरी टिकून राहते. त्याचा निचरा किंवा विघटन होत नाही. ते निसर्गाला, माणसांना, प्राण्यांना हानीकारक आहे. त्यातून नद्या, समुद्र प्रदूषित होतात. निरनिराळे आजार, नाले तुंबणे, आदी समस्यांना आताही व यापुढेही सर्वांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापुरातील डॉ. मेधा ताडपत्रीकर व शिरीष फडतरे यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून कायमचा इलाज करणारे तंत्रज्ञान शोधले आहे. याचा प्रयोग राजारामपुरी अकरावी गल्ली येथील युवक मित्र मंडळाच्या गणेश देखाव्यातून सादर केला आहे. या प्रक्रिया प्रकल्पात पुण्यातील ५५०० कुटुंबे व कॉर्पोरेट कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. हा देखावा पूर्ण झाला असून बुधवारपासून सर्वांसाठी पाहण्यास खुला झाला आहे.


अशी होते इंधननिर्मिती
या प्रक्रियेला रुद्र प्रक्रिया म्हणतात. एक प्रकारची पायरॉलिसिस रासायनिक प्रक्रिया केली जाते. यामध्ये घनरूप पदार्थ गरम करून त्यांचे विघटन केले जाते. पायरॉलिसिस ही १०० वर्षे जुनी संकल्पना आहे. यामध्ये आॅक्सिजनसोबत प्रतिक्रिया होत नाही, तर आॅक्सिजनविरहित ही प्रक्रिया पूर्ण होते. यात पॉलिमरच्या शृंखलेवर प्रक्रिया करून त्या तोडल्या जातात आणि त्यातून संयोगिक हायड्रोकार्बनचे इंधन मिळते. साधारणत: १०० किलो प्लास्टिकपासून ५० ते ६५ लिटरपर्यंत तेल मिळू शकते, तर २० ते २२ टक्के गॅस मिळतो. हा गॅस इंधन म्हणून प्रकल्पात पुन्हा वापरला जातो, तर तेलाची इंधन म्हणून विक्री करता येते. शिल्लक राहणारी काजळी रबर व प्लास्टिक उद्योगात रंग म्हणून वापरात येऊ शकते. कोल्हापूरचा विचार करता, दररोज २०० टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये शहरात निर्माण होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण दरदिवशी ३० टन होते.



याला काय लागते?
दूध, तेलाच्या पिशव्या, सर्व प्रकारच्या जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, टूथपेस्ट, औषधांच्या ट्यूब्ज, पाण्याच्या बाटल्या, सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या, शाम्पू, पावडरचे डबे, फिनेलच्या बाटल्या, साबणाच्या पिशव्या, वेफर्स, बिस्किटे, ब्रेड, खाऊच्या पिशव्या, रॅपर्स, बबल, स्टिकर पॅकेजिंग, आदींचा उपयोग या प्रयोगात करता येतो.


हा समाजोपयोगी इंधननिर्मितीचा प्रकल्प आहे. हे एक समाज प्रबोधनाचे पाऊल आहे. त्यामुळे सर्व कोल्हापूरकरांनी हा प्रयोग पाहण्यास यावे.
- किशोर मळेकर, सचिव, युवक मित्र मंडळ
राजारामपुरी चौथी गल्ली येथील जय मराठा तरुण मंडळाने ‘राधाकृष्ण रासलीला’ हा तांत्रिक देखावा केला आहे. बुधवारी या देखाव्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते; तर उद्यमनगर येथील मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाने ‘ पोकेमॅन गो’ हा तांत्रिक देखावा तयार केला असून, त्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

Web Title: Preparation of the scene in the final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.