महावितरणच्या थकबाकीमुक्तीला आता कामगारांचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:27 AM2021-09-18T04:27:17+5:302021-09-18T04:27:17+5:30
कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी आता कामगार संघटनांनी महावितरणसोबत सहकार्याचा हात पुढे केला ...
कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी आता कामगार संघटनांनी महावितरणसोबत सहकार्याचा हात पुढे केला आहे. महावितरणचे अस्तित्व कायम राहण्यासाठी या कामगारांनी महावितरणच्या थकबाकीमुक्ती मोहिमेत सक्रिय होण्याचा निर्धार केला आहे.
कोल्हापूर परिमंडळाची बैठक शुक्रवारी मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात झाली. कामगार संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. कोरोना व त्यांनतर आलेल्या महापूर यामुळे वीजबिलांच्या थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. आजच्या घडीला परिमंडळात येणाऱ्या कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांचा थकबाकीचा आकडा ८०० कोटींवर गेला आहे. एवढी मोठी थकबाकी वसूल करणे हे मोठे आव्हान आहे. एकट्या अधिकाऱ्यांवर हे आव्हान पेलणे शक्य नसल्याने, कर्मचारी संघटनेकडे मदतीची मागणी केली होती. महावितरणवरच कर्मचाऱ्यांचे अस्तित्व अवलंबून असल्याने, स्वत:ची नोकरी टिकविणे म्हणजे महावितरण टिकविणे असल्याने, कर्मचाऱ्यांनी या वसुली माेहीम सक्रिय होण्याची तयारी दर्शविली. या बैठकीस मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
आता जबाबदारी ग्राहकांची
ग्राहकांना अखंडित, दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा देण्याची जबाबदारी महावितरणवर आहे. दरमहा वीजबिल वसुलीच्या महसुलावरच महावितरणची भिस्त असते. महावितरण वाचले, तरच सरकारी आणि कमी दराने वीज उपलब्ध होणार आहे, ते डबघाईला आले, तर खासगी कंपन्याच्या दावणीला बांधले जाणार आहे, याची जाणीव जरी ग्राहकांनी ठेवली, तरी वसुलीचा टक्का वाढणार आहे.