सीमालढ्याला कोल्हापूरवासीयांचे बळ
By Admin | Updated: January 18, 2017 01:02 IST2017-01-18T01:02:37+5:302017-01-18T01:02:37+5:30
दीपक दळवी : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना बिंदू चौकामध्ये अभिवादन

सीमालढ्याला कोल्हापूरवासीयांचे बळ
कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोल्हापूरवासीयांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांचे हे ऋण आमच्या कायम लक्षात राहतील. गेल्या ६२ वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला यश येऊन आमची कर्नाटकी अन्यायातून मुक्तता होईल, असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी मंगळवारी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे बिंदू चौक येथे संयुक्त महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी सीमावासीयांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महापौर हसिना फरास, बेळगावचे आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किणीकर, महेश जुळेकर, अॅड. गुलाबराव
घोरपडे, दिनेश ओऊळकर, अॅड. धनंजय पठाडे, अशोकराव साळोखे, दीपा पाटील, शैलजा भोसले उपस्थित होत्या.
दळवी म्हणाले, आॅक्टोबरमध्ये झालेल्या मराठा मोर्चात बेळगाववासीयांनीही सहभाग घेतला होता. यावेळीही संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. सीमावासीयांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कोल्हापूरकरांनी नेहमी आमची साथ दिली आहे. ही ताकद अशीच आमच्या पाठीशी राहू दे आणि लवकरात लवकर आमची या अन्यायातून मुक्तता व्हावी, अशी अपेक्षा आहे.
प्रास्ताविकात संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ या विषयावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. १७ जानेवारी १९५६ रोजीच्या संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यातील हुतात्मे लक्ष्मण गावडे, मधू बांदेकर, महादेव बारागडी, पैलवान मारुती बेनाळकर, निपाणीमधील कमळाबाई मोहिते, कोल्हापूरचे शंकरराव तोरस्कर यांच्यासह १०५ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. बबनराव रानगे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, कमलाकर जगदाळे, संभाजी चेंडके, संभाजीराजे जगदाळे, सुंदरराव देसाई यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.