२७ वॉर्डांची शक्यता, वॉर्ड रचनेची नव्याने प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:06+5:302021-09-24T04:27:06+5:30
एक प्रभाग, एक सदस्य पध्दतीने होणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रकिया जवळपास अर्ध्यावर असतानाच, राज्य सरकारने त्रिसदस्यीय पध्दतीने निवडणूक घेण्याचा ...

२७ वॉर्डांची शक्यता, वॉर्ड रचनेची नव्याने प्रक्रिया
एक प्रभाग, एक सदस्य पध्दतीने होणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रकिया जवळपास अर्ध्यावर असतानाच, राज्य सरकारने त्रिसदस्यीय पध्दतीने निवडणूक घेण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे निवडणुकीचे सर्वच संदर्भ बदलले आहेत. त्रिसदस्यीय वॉर्ड रचनेनुसार होणारी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने, निवडणूक कशी होणार, वॉर्ड रचना कशी असणार याबाबत शहरवासीयांमध्ये कमालीची उत्कंठा आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे वॉर्ड रचना होणार आहे. शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे प्रत्यक्ष नकाशावर वॉर्डांची रचना केली जाणार आहे. प्रगणक गट हा त्याचा मुख्य आधार असेल. कोल्हापूर शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार पाच लाखाच्या घरात आहे. परंतु नवीन नोंदणी सतत होत असल्याने ती साडेपाच लाख लोकसंख्येपर्यंत जाईल, असे अपेक्षित आहे. सरासरी पाचशे मतदारांचा एक प्रगणक गट असतो. लगतचे प्रगणक गट धरून साधारण अठरा हजार मतदारांचा एक वॉर्ड तयार केला जाईल. प्रत्येक वॉर्डात अ, ब, क अशा पध्दतीने आरक्षणातील उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे.
वॉर्ड रचना निश्चित झाल्यानंतर त्यावर हरकती मागविल्या जातील. हरकतींवर सुनावणी होईल. आवश्यकतेनुसार दुरुस्त्याही होतील. त्यानंतर ही वॉर्ड रचना अंतिम केली जाईल. त्यानंतरची महत्त्वाची प्रक्रिया आरक्षणाची असेल. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण टाकले जाईल. आरक्षण टाकण्याची प्रक्रिया देखील निश्चित स्वरूपाची आहे. कोणत्या प्रवर्गाला किती आरक्षण असेल, हेही निश्चित केले जाईल. प्रथम अनुसूचित जातीचे महिला व पुरुष असे आरक्षण टाकले जाईल. त्यानंतर नागरिकांचा मागासवर्ग महिला व पुरुष आरक्षण निश्चित केले जाईल. राहिलेले सर्व वाॅर्ड सर्वसाधारण खुले होतील. महिलांसाठी वॉर्ड निश्चित केल्यानंतर बाकीचे आपोआपच सर्वसाधारण पुरुषासाठी असतील. आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाॅर्डनिहाय मतदार याद्या तयार केल्या जातील.
- प्रत्येकाला तीन मतांचा अधिकार
याआधी शहरवासीयांचा एक प्रभाग एक सदस्य पध्दत होती, त्यावेळी एका मतदारास एक मत देण्याचा अधिकार होता. आता त्रिसदस्यीय पध्दतीमुळे एका मतदारास तीन मते देण्याचा अधिकार राहणार आहे. तीन पॅनेल पध्दतीने उमेदवार निवडून देण्याची संधी मिळणार आहे.
- इच्छुकांची होणार दमछाक
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना याआधी एक प्रभाग असल्याने, काही तासात सहज फेरफटका मारता येत होता. आता तीन प्रभाग एक होऊन वाॅर्ड तयार होणार असल्याने अठरा हजार मतदारांपुढे जाताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. निवडून येण्यासाठी आघाडीतील अन्य सहकारी उमेदवारांची मदत घ्यावीच लागेल.