सफाईच्या पैसे वसुलीवरून राजकारण
By Admin | Updated: December 16, 2014 00:18 IST2014-12-15T20:15:49+5:302014-12-16T00:18:26+5:30
इचलकरंजी पालिका : प्रस्ताव मंजूर करणारेच आता विरोध; काहींचा सभागृहात एक, तर बाहेर दुसरा पवित्रा

सफाईच्या पैसे वसुलीवरून राजकारण
इचलकरंजी : घरोघरी कचरा गोळा करण्याकामी नगरपालिका घरफाळ्याबरोबर वार्षिक २४० रुपये जमा करण्याच्या प्रस्तावावर आता राजकारण चालू झाले असून, सभागृहात प्रस्तावाच्या बाजूनेच असलेले नगरसेवक आता विरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. काही राजकीय पक्षांनी सभागृहात एक, तर बाहेर दुसरा पवित्रा घेतला आहे.
शहरातील ज्या वॉर्डामध्ये घरोघरी कचरा गोळा करणे, रस्ते-गटारी साफ करून कचरा वाहतूक करण्याकामी बचत गट व मक्तेदार यांच्यामार्फत सध्या सुरू असलेल्या कामांसाठी नागरिकांकडून नगरपालिकेमार्फत ठरविण्यात आलेल्या दराने शुल्क आकारणीबाबतचा विषय नगरपालिकेच्या १२ डिसेंबरच्या सभेत चर्चेत आला असताना या विषयास प्रथम सत्तारूढ व विरोधी अशा दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.
त्यामुळे हा विषय नामंजूर करण्याचे ठरले; पण या विषयाबाबत खुलासा करताना मुख्याधिकारी सुनील पवार यांनी, गेले दोन वर्षे शासकीय लेखापरीक्षणामध्ये अशा प्रकारची शुल्क आकारणी केली नसल्याबद्दल आक्षेप घेण्यात आलेला आहे. हा विषय मंजूर न झाल्यास संबंधित नगरसेवकांना जबाबदार धरून नगरसेवकांकडून त्याची वसुली होईल, असे सांगितले.
मुख्याधिकाऱ्यांच्या खुलाशानंतर काहीशा गोंधळात पडलेल्या नगरसेवकांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली नसली तरी वसुलीस विरोध दर्शविला नाही. तेव्हा दोन्ही बाजूच्या काही नगरसेवकांनी वसुलीबाबत काही उपाय सूचविले.
संबंधित खासगी मक्तेदाराला नागरिक महिना वीस रुपयांची रक्कम देणार नाहीत. वारंवार वादाचे प्रसंग निर्माण होतील. म्हणून नगरपालिकेच्या घरफाळ्यासोबत मागणी सूचना देऊन वार्षिक २४० रुपये वसूल करावेत आणि ती रक्कम संबंधित मक्तेदाराला अदा करावी, असे ठरविण्यात आले. शहरात असलेल्या साधारणत: ५० हजार कुटुंबीयांकडून ही रक्कम वसूल होणार आहे. साधारणपणे सव्वा कोटी रुपये इतकी रक्कम होते. (प्रतिनिधी)
नागरिकांतून विरोधाची प्रतिक्रिया
नगरपालिकेच्यावतीने सफाईची रक्कम वसूल होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत नागरिकांतून विरोधाची प्रतिक्रिया उमटू लागली. तसेच शहरातील मोबाईल संचावर, व्हॉटस् अॅपवरून तीव्र नाराजी असलेले मेसेज पसरू लागले.
तसेच नागरिकही विरोधात बोलू लागल्याने आता नगरसेवकसुद्धा या प्रस्तावास विरोध करण्याबाबत आपला विरोध असल्याचे सांगू लागले आहेत. त्यामध्ये दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे. पालिकेमध्ये भाजप घटक पक्ष असलेली शहर विकास आघाडी आहे. आज, सोमवारी भाजपचे एक शिष्टमंडळ नगरपालिकेत आले आणि त्यांनी सफाईसाठी नागरिकांकडून वार्षिक २४० रुपये वसुलीला विरोध दर्शविला.
शहर अध्यक्ष विलास रानडे, दीपक राशिनकर, सुभाष मालपाणी, ऋषभ जैन, कमल तिवारी, शंकरराव तोरस्कर, आदींनी उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले व कामगार अधिकारी विजय राजापुरे यांना सुमारे अर्धा तास घेराव घातला होता. अशा प्रकारच्या राजकारणामुळे आता हा विषय गाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.