‘लोकशाहीचा दर्जा राजकारण, माध्यमांवर अवलंबून’
By Admin | Updated: January 23, 2015 23:36 IST2015-01-23T00:21:03+5:302015-01-23T23:36:23+5:30
अंबाजोगाई : भारतीय लोकशाहीचा दर्जा हा राजकारण व प्रसारमाध्यमांच्या दर्जावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी केले.

‘लोकशाहीचा दर्जा राजकारण, माध्यमांवर अवलंबून’
अंबाजोगाई : भारतीय लोकशाहीचा दर्जा हा राजकारण व प्रसारमाध्यमांच्या दर्जावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी केले.
येथील योगेश्वरी शिक्षण संस्था व विद्यापिठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने जागर लोकशाहीचा या उपक्रमांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून जयदेव डोळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे होते. तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप चव्हाण, प्राचार्य डॉ. बी. आर. चव्हाण उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा. डोळे म्हणाले की, भारतीय लोकशाहीसमोर मोठी आव्हाने आहेत. लोकशाही निवडणुकीतील गैरप्रकार प्रसारमाध्यमातील घसरण, जातीयवाद, धर्मवाद, अशी नवीन आव्हाने समोर उभी राहिली आहेत. या सर्व आव्हानांचा सामना सामुहिकपणे झाला पाहिजे. अध्यक्षीय समारोपात बोलतांना डॉ. खुरसाळे यांनी भारतीय लोकशाही मूल्यव्यवस्था टिकवायची असेल तर युवकांनी धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
दीपप्रज्वलन व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून जागर लोकशाहीचा या उपक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका प्रा. डॉ. शैलजा बरूरे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. बालाजी रुद्देवाड यांनी मानले. (वार्ताहर)