कागलमधील राजकीय समीकरणे बदलणार
By Admin | Updated: May 13, 2016 00:52 IST2016-05-13T00:36:03+5:302016-05-13T00:52:27+5:30
थेट नगराध्यक्ष निवड : नगरपालिकेत राजे-मुश्रीफ गट सत्तेत; गटांच्या भूमिका महत्त्वपूर्ण

कागलमधील राजकीय समीकरणे बदलणार
जहॉँगीर शेख -- कागल --जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीबद्दल राज्य शासन निर्णय घेणार असल्याच्या वृत्ताचे पडसाद सर्वच नगरपालिकांमध्ये पहावयास मिळाले. विशेषत: राजकीय वर्तुळात नवी समीकरणे, आराखडे बांधले जात आहेत. कागल नगरपालिकेत आज राजे-मुश्रीफ गट एकत्रित सत्तेत आहेत. हाच पॅटर्न पुढे चालविला जाणार अशी शक्यता व्यक्त होत होती; मात्र थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे कागल पालिका सत्ताधारी गटाची समीकरणे बिघडणार आहेत.
२००१ मध्ये अशा पद्धतीने निवडणूक झाली होती. कागल शहरात त्यावेळी राजे विक्रमसिंह घाटगे गटाकडून श्रीमती कांचनमाला घाटगे या उमेदवार होत्या. त्यावेळी मंडलिक-मुश्रीफ एकत्र होते आणि आशाकाकी माने यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला होता, तर सुलोचना साळोखे याही प्रबळ इच्छुक होत्या. या पार्श्वभूमीवर कांचनमाला घाटगे यांनी शोभा पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर नगरपालिकेच्या दोन निवडणुका नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवड पद्धतीने झाल्या आहेत. या दहा वर्षांच्या कालावधीत कागल शहरातील राजकीय घडामोडी वेगाने बदलल्या आहेत. मुश्रीफ गट दहा वर्षे सत्तेत आहे. मंडलिक, संजय घाटगे गटाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सक्रिय झाली आहे. शहरात बऱ्यापैकी ताकद टिकवून असणारा राजे गट गेल्या पाच वर्षांत मुश्रीफ गटाबरोबर आघाडी करून पालिकेत सत्तेत आहे. पाच वर्षांत पदाची वाटणी करून या प्रबळ गटांनी सत्ता राबविली आहे. मात्र, आता थेट शहरातून सर्वच लोक मतदान करून नगराध्यक्ष निवडणार असल्याने आपला उमेदवार ठेवण्याचा आग्रह दोन्ही गटांकडून होणार आहे. नगराध्यक्ष कोणाचा? या मुद्द्यावरूनच सत्ताधारी गटात आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता आहे.
कागल शहरावर राजकीय वर्चस्व कोणाचे याचा थेट फैसला या निमित्ताने होणार असल्याने मुश्रीफ गट अथवा राजे गट ही संधी सहजासहजी सोडणार नाहीत. इतर लहानसहान गट या दोन मोठ्या गटांच्या भूमिका बघून मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीची पद्धत कागल शहरातील राजकरणात चुरस
आणि ईर्ष्या निर्माण करणारी ठरणार आहे.
आता अंतिम निर्णय कधी होणार, आरक्षण काय निघणार आणि उमेदवार कोण असणार? यावरही बरेच अवलंबून असल्याने तूर्त केवळ चर्चा सुरू आहेत.