पोलीस टोलवसुली करणार नाहीत

By Admin | Updated: June 10, 2014 02:10 IST2014-06-10T02:04:30+5:302014-06-10T02:10:12+5:30

पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा

The police will not make tolls | पोलीस टोलवसुली करणार नाहीत

पोलीस टोलवसुली करणार नाहीत

कोल्हापूर : शहरात टोलवसुली सुरू केल्यास टोलनाक्यांवर मारामारी, झगडा होणार नाही. तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याची सक्त ताकीद ‘आयआरबी’ला देण्यात येईल, असे सांगतानाच पोलीस हे टोलवसुलीचे काम करणार नाहीत, तर तेथे बाजूला थांबून केवळ कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच हस्तक्षेप करतील, असा खुलासा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाजवळ केला.
उच्च, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस टोलनाक्यांना संरक्षण देणार आहेत. टोल देण्याच्या आणि घेण्याच्या प्रक्रियेशी पोलिसांचा कोणताही संबंध असणार नाही. जोपर्यंत कोणी आमच्याकडे तक्रार करणार नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही. जर पोलीस ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांना मदत करीत आहेत, असे दिसून आले तर पोलीस अधीक्षक म्हणून माझ्याकडे तक्रार द्या, पण टोलनाक्यांवर जाऊन कोणीही दंगा करू नये, असे आवाहनही शर्मा यांनी केले.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, टोलवसुलीची सक्ती केली जाऊ नये. जर कोणा वाहनधारकाला टोल द्यायचा नसेल, तर त्याला नाक्यावरून जाऊ द्यावे. त्याच्या विरोधात काही तक्रार असेल तर ‘आयआरबी’ने पोलीस ठाण्यात अथवा दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागावी. जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मात्र कोणतेही ठोस आश्वासन न देता फक्त तटस्थपणाची भूमिका घेतली. आपण आलात, शांततेत मोर्चा काढला, याबद्दल आपणास धन्यवाद. आपल्या भावना शासनाला कळवितो, एवढ्या माफक शब्दात माने यांनी उत्तर दिले. आंदोलनातून सकारात्मक मार्ग निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
 

Web Title: The police will not make tolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.