पाटबंधारे, महावितरण शेतकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:51 IST2016-05-10T21:46:57+5:302016-05-11T00:51:53+5:30
१९७२ नंतर प्रथमच पाणी संकट : शिरोळ तालुक्यात पाणी उपसाबंदीमुळे शेतकरी अडचणीत

पाटबंधारे, महावितरण शेतकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर
गणपती कोळी -- कुरुंदवाड --पिण्याच्या व शेतीच्या पाण्याबाबत शिरोळ तालुका राज्यामध्ये समाधानी मानला जातो़ ‘पाऊस कमी मात्र पुराची हमी’ असणाऱ्या या तालुक्यावर प्रथमच दुष्काळाचे सावट उमटू लागले आहेत़ पाणीटंचाईमुळे पाटबंधारे विभाग पाणी कपातीचे धोरण अवलंबत असल्याने पाटबंधारे विभाग, विद्युत मंडळ शेतकऱ्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असून, पाणी कपातीवरून तालुका संवेदनशील बनला आहे़तालुक्यातून पंचगंगा, वारणा, कृष्णा, दूधगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे, तसेच बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतामधील विहिरी, कूपनलिकेमुळे येथील शेतकऱ्याला पाण्याची टंचाई कधीच भासली नाही़ उलट पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे शेती नापीक बनू लागली़ मुबलक पाणी, समाधानकारक पाऊस, शेतीचे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शिरोळ तालुका उपलब्ध फळभाज्यांचे विक्रमी उत्पादन घेण्यात अग्रेसर ठरला आहे़ तालुक्यातील सुमारे ८० टक्के क्षेत्र ऊस पिकाच्या लागवडीखाली असल्याने व पाणीही मुबलक असल्याने चांगले उत्पादन व उसाला चांगला दर मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला़
शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून खा़ राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचे पाठबळ मिळाल्याने चांगले राजकीय बस्तानही बसले़ शेतकऱ्यांचे मतदान मिळविण्यासाठी राजकारणात सर्वच राजकीय पक्ष, संघटना आपापल्या परीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा राजकीय स्टंट करीत आहेत़
पाऊस कमी पुराची हमी देणाऱ्या या तालुक्यात यंदा अत्यल्प पावसामुळे शेतीचे नियोजनच कोलमडले आहे़ धरणातील पाणीसाठा मर्यादित राहिल्याने नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत़ दुष्काळाचे सावट १९७२ नंतर प्रथमच जाणवत आहेत़ नदीतील पाण्याबरोबर शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकेच्या पाण्यानेही तळ गाठला आहे़ पाटबंधारे विभाग पाण्याच्या नियोजनासाठी कपातीचे धोरण अवलंबीत असल्याने व विद्युत मंडळ विद्युतपुरवठा खंडित करत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे़
शेतीवरच पूर्णपणे अर्थकारण अवलंबून असलेल्या या शेतकऱ्याचे पीक पाण्याअभावी वाळत असल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या या संकटाकडे कोणताही राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी धावून येत नसल्याने शेतकऱ्यांतूनच संताप व्यक्त होत आहे़ त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भरोशावर न राहता पाटबंधारेचे अधिकारी, विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत़
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वारणा, पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा अशा चार नद्या असलेल्या शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या जिवावरच राजकारण सुरु आहे़ या तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत आहे़ मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वत: शेतकरीच लढताना दिसत असताना कोणताही राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी न्याय हक्काच्या मदतीसाठी येत नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़