(पान १ व राज्यासाठी) मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईला प्रारंभ; आता स्वस्थ न बसण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:09+5:302021-06-17T04:17:09+5:30
कोल्हापूर : कोणत्याही वर्गाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीच्या रस्त्यावरील अंतिम ...

(पान १ व राज्यासाठी) मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईला प्रारंभ; आता स्वस्थ न बसण्याचा संदेश
कोल्हापूर : कोणत्याही वर्गाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीच्या रस्त्यावरील अंतिम लढाईला ऐतिहासिक कोल्हापुरातून गुरुवारी जोरदार पावसाच्या साक्षीने सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील या अंतिम लढाईचे रणशिंग फुंकताना मराठा समाज आता आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा संदेश या मूक आंदोलनातून देण्यात आला.
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळी गुरुवारी झालेल्या मूक आंदोलनात राज्यभरातून आलेल्या मराठा समाजातील प्रमुख समन्वयक, तसेच जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित झाली. आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावरच ती शांत होईल.
या आंदोलनाची दाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने घेतली असून, आमच्या अखत्यारितील ज्या पाच प्रमुख मागण्या आहेत, त्या चर्चेतून सोडविण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच आज, शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून चर्चा घडवून आणली जाईल, आपण चर्चेला यावे, अशी आग्रही विनंती दोन्ही मंत्र्यांनी खासदार संभाजीराजे यांना केली.
राज्य शासनाने दिलेल्या निमंत्रणाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले. चर्चेला जायचे की नाही हे सर्व समन्वयकांशी बारकाईने विचारविनिमय करून निर्णय घेऊ, तोपर्यंत जर आमच्या पाच प्रमुख मागण्या पूर्ण केल्या, तर नाशिक येथील मूक आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करू, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण मिळवून देण्याच्या बाबतीत राज्य सरकार ठाम आहे. यापूर्वी झालेल्या चुका टाळून आरक्षण देईपर्यंत जी-जी जबाबदारी राज्य सरकारची असेल ती-ती पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट केले.
-राजकारण न करता चुका मान्य करू या
‘वाट्टेल ती किंमत देऊ, पण आरक्षण मिळवून देऊ’, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जी चूक मागच्या राज्य सरकारकडून झाली, तीच चूक आमच्या सरकारकडूनही झाली. आता राजकारण करत न बसता या चुका मान्य करून समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या प्रक्रियेत भाजपनेदेखील आता सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी त्यांनी केले.
-पंतप्रधान का बोलत नाहीत?
मराठा आरक्षणाचे आंदोलन गेले अनेक वर्षे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत युक्तिवाद झाले. तरीही आरक्षण मिळाले नाही. मराठा समाज अस्वस्थ असताना आणि तो आरक्षण मागत असताना केंद्र सरकारचे प्रमुख असणारे पंतप्रधान याबाबत का बोलत नाहीत? असा सवाल शाहू छत्रपती यांनी या वेळी उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. सभागृहात पंतप्रधानांचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांनीच आता जबाबादारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
-राज्यभरातील कार्यकर्त्यांचा सहभाग
जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, तसेच राज्यभरातील मराठा समाजाचे समन्वयक यांनी मूक आंदोलनात सहभाग घेतला. ‘समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनी बोलावे’ या आवाहनानुसार केवळ लोकप्रतिनिधींचीच या वेळी भाषणे झाली. जोरदार पावसात भिजत आंदोलनाची सांगता होईपर्यंत सर्व जण बसून होते.