महर्षी शिंंदे यांचे समग्र जीवन लोकांसमोर
By Admin | Updated: February 27, 2016 01:41 IST2016-02-27T01:39:16+5:302016-02-27T01:41:57+5:30
मुंबईत आज ग्रंथ प्रकाशन : मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; आत्मपर लेखनाचा दुसरा खंड

महर्षी शिंंदे यांचे समग्र जीवन लोकांसमोर
कोल्हापूर : आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अस्पृश्यता उद्धाराचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनावरील आत्मपर लेखनाचा दुसरा खंड आज, शनिवारी प्रकाशित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात हा समारंभ सायंकाळी सहा वाजता होत आहे. मराठी साहित्यातील व्यासंगी समीक्षक गो. मा. पवार व नव्या पिढीतील समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.
महर्षी शिंदे यांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हाती घेतला आहे. त्यातील पहिला खंड ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, संशोधन व आणि चिंतन..’ पाच वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. त्याचे लेखन गो. मा. पवार यांनीच केले आहे. पवार हे शिंदे यांचे तसे नातजावई लागतात. गेली तीस वर्षे त्यांनी अत्यंत कष्टाने विविध साधने जमा करून त्यांची पाच चरित्रे लिहिली आहेत. आताचा हा खंड आत्मपर लेखनाचा असून त्यातही रोजनिशी, माझ्या आठवणी व अनुभव, प्रवासवर्णन असे तीन भाग आहेत. या तिन्ही भागांच्या स्वतंत्र पुस्तिकाही उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. त्याची अत्यंत सुबक छपाई कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयात झाली आहे.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये अस्पृश्यतेसारखा माणुसकीला कलंकभूत असणारा प्रश्न अस्तित्वात आहे याची कोणाला फारशी जाणीवसुद्धा नव्हती. अशा काळात सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी व त्यांची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी सन १९०६ मध्ये ‘डिस्पे्रड क्लासेस मिशन’ ही अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी संस्था स्थापन करण्याचा द्रष्टेपणा आणि कर्तेपणा महर्षी शिंदे यांनी दाखविला. महर्षी शिंदे हे अस्पृश्यता निवारण कार्याच्या जागृती पर्वाचे प्रणेते व ह्या कार्याचे अग्रदूत होते. शिंदे यांनी आयुष्याच्या तीन वेगवेगळ््या कालखंडामध्ये रोजनिशी लिहिली. ती त्यावेळच्या वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे. तशीच ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही प्रत्यय देणारी आहे. महर्षी शिंदे यांची रोजनिशी वाचताना आपण एक चांगल्या दर्जाची वाङ्मयीन कृती वाचत आहोत असा अनुभव येतो. त्यांचे आत्मचरित्र वाचताना एका सात्विक, निरहंकारी, क्षमाशील वृत्तीच्या पुरुषाने लिहिले आहे, असा प्रत्यय सातत्याने येत राहतो. महर्षी शिंदे यांचे हे आत्मपर लेखन हे कृतीवीर असणाऱ्या धर्मनिष्ठ पुरुषाचे आहे. त्यांच्या प्रवास वर्णन लेखनातूनही उच्चप्रतीचे चिंतन आपल्याला आढळते. महर्षी शिंदे हे जसे सुधारक व विचारवंत होते त्याचप्रमाणे ते एक श्रेष्ठ दर्जाचे ललित साहित्याचे सर्जनशील लेखकही होते. नव्या ग्रंथातून त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्याने समाजासमोर येत आहे.