आमची युती ही शुभच

By Admin | Updated: March 21, 2016 00:22 IST2016-03-21T00:22:16+5:302016-03-21T00:22:26+5:30

हसन मुश्रीफ : गडहिंग्लज कारखाना निवडणूक; चन्नेकुप्पीत शेतकरी आघाडीचा मेळावा

Our alliance is auspicious | आमची युती ही शुभच

आमची युती ही शुभच

गडहिंग्लज : आपण कुणाचाही विश्वासघात केलेला नाही. जागावाटपात तडजोड न केल्यामुळे प्रकाश चव्हाण व त्यांचे सहकारी आघाडीतून बाहेर गेले आहेत. शेतकरी व कामगारांच्या भल्यासाठीच जनता दल व राष्ट्रवादी एकत्र आली आहे, त्यामुळे चांगल्या हेतूने केलेली ही युती शुभच आहे, असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग चव्हाण होते. आमदार संध्यादेवी कुपेकर व माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनाही आघाडीत घेण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, ते १० जागांच्या मागणीवर ठाम राहिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार होता. त्यामुळेच त्यांची मागणी मान्य करता आली नाही.
संग्रामसिंह नलवडे म्हणाले, स्व. कुपेकरांच्या प्रयत्नामुळे चित्री व फाटकवाडी प्रकल्प झाल्याने हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदी बारमाही झाली. दीड लाख उसाचे उत्पादन १० लाख टनाच्या घरात गेले. मात्र, गाळपक्षमता न वाढल्यामुळे शेतकरी व कारखान्याची कोंडी झाली. गतवैभवासाठी कारखान्याच्या विस्तारीकरणाची गरज आहे.
यावेळी उदय जोशी, रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, बाळेश नाईक व सतीश पाटील यांचीही भाषणे झाली. रामाप्पा करिगार यांनी स्वागत केले. मेळाव्यास प्रा. स्वाती कोरी, बाबूराव चौगुले, बाळ पोटे-पाटील, अरविंद पाटील, आदींसह उमेदवार व पंचक्रोशीतील सभासद उपस्थित होते. बाळासाहेब मोर्ती यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)

व्यक्तिगत बोलणे थांबवा; अन्यथा..!
प्रचारात कुणावरही व्यक्तिगत टीकाटिप्पणी करायची नाही, अशी आपली भूमिका आहे. तरीदेखील काही मंडळी व्यक्तिगत टीका करीत आहेत. त्यांनी व्यक्तिगत
निंदा-नालस्ती थांबवावी; अन्यथा आपल्यालाही बोलणे भाग पडेल, असा इशारा आमदार मुश्रीफ यांनी विरोधकांना दिला.

जबाबदारी नको..पण ‘चावी’ पाहिजे !
निवडून आल्यानंतर नियमाप्रमाणे शासनाला बंधपत्र द्यावे लागते. ते न दिल्यामुळे संचालक मंडळातून शहापूरकर कमी झाले. सत्तेची चावी पाहिजे; मात्र कारखान्याची जबाबदारी घेण्याची तयारी नाही, अशांना निवडणूक लढविण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

‘भोगावती’ बिनविरोधसाठी ‘ए. वाय.’ यांचा पुढाकार
सर्वांशी चर्चेची तयारी : जिल्हा बँक, विधानसभेच्या राजकारणाची किनार
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी हालचाली गतिमान केल्या असून, काँग्रेससह कारखान्यांशी संबंधित सर्वच घटकांशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी केली आहे.
‘भोगावती’ करवीर व राधानगरी विधानसभा मतदारसंघांतील राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथे गेली अनेक वर्षे काँग्रेसविरोधात शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस असाच सामना पाहावयास मिळत आहे. गतनिवडणुकीत राष्ट्रवादी व ‘शेकाप’ने एकत्रित येत आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह इतर पक्षांची मदत घेत काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावला होता. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला विरोध करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडलेली नाही. वाढीव सभासद, कारखान्याचा कारभार व प्रशासक नियुक्तीबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यात भोगावती शिक्षण मंडळाच्या वादामुळे दोन्ही काँग्रेसमधील संबंध टोकाला गेले असतानाही साखर उद्योगासमोरील अडचणी, केंद्र व राज्य सरकारचे धोरण पाहता दोन्ही काँग्रेसमधील वाद संपवून निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रयत्न
‘ए. वाय.’ यांचा आहे.
कारखान्याच्या राजकारणांत दोन्ही काँग्रेसचे ताणलेले संबंध पाहता, बिनविरोध निवडणूक अशक्य वाटत असली, तरी यास जिल्हा बँकेच्या राजकारणाची किनार या घडामोडी आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘ए.वाय.’ यांना राधानगरीतून बिनविरोध करण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे योगदान फार मोठे आहे. करवीरमधून ‘पी.एन.’ यांना बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेत चंद्रदीप नरके यांची समजूत काढली होती. दोन्ही कॉँग्रेसचे जरी मिटले तरी ‘शेकाप’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीत ‘बिनविरोध’साठी अडचणी अधिक असल्या तरी सर्वच नेत्यांनी मनावर घेतले तर अशक्यही नाही.

विधानसभेचा अनुभव पाठीशी!
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा फायदा झाला. ‘करवीर’मध्ये राष्ट्रवादीच्या सहकार्याने चंद्रदीप नरके पुन्हा आमदार झाले तर राधानगरीमध्ये काँग्रेसच्या सहकार्याने प्रकाश आबीटकर यशस्वी झाले; पण आता दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांना या चुका कळल्याने ‘भोगावती’मध्ये तडजोड करावी, असा मतप्रवाह दोन्ही काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांचा आहे.

सरकारच्या धोरणाने साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत संस्था वाचविण्यासाठी सर्व मतभेद विसरून बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. काँग्रेस, शेकाप, शिवसेनेसह सर्वच घटकांशी चर्चा करून प्रस्ताव देणार आहे. जिल्हा बँक बिनविरोध झाल्याने आपल्यावरील जबाबदारी वाढली असून, जागा किती मिळणार हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही.
- ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस

लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ठरलेली असते. ‘गोड’ साखर कारखान्यासाठी पाचशे अर्ज दाखल झाले, हा अनुभव पाठीशी असताना बिनविरोध करतो म्हणणे सोपे नाही; पण कारखान्याच्या हितासाठी तशी परिस्थिती निर्माण झाली तर ‘शेकाप’ त्यात सहभागी होईल.
- संपतराव पवार, माजी आमदार

गेल्या सहा वर्षांतील कारभार व कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता ‘भोगावती’ ला चांगल्या प्रशासनाची गरज आहे. बिनविरोध अथवा निवडणुकीबाबत सभासदांना विश्वासात घेतल्याशिवाय बोलणे उचित ठरणार नाही.
- उदयसिंह पाटील-कौलवकर, नेते, काँग्रेस

Web Title: Our alliance is auspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.