..अन्यथा पन्हाळ्याचा पाणीपुरवठा बंद करू
By Admin | Updated: October 16, 2015 22:22 IST2015-10-16T22:03:59+5:302015-10-16T22:22:02+5:30
जीवन प्राधिकरणाचा नगरपालिकेला इशारा : पाणीपुरवठ्यासाठी नगरपालिकेने कर्मचारी उपलब्ध करावेत; याप्रश्नी नगरपालिकेची विशेष सभा

..अन्यथा पन्हाळ्याचा पाणीपुरवठा बंद करू
पन्हाळा : पन्हाळा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कमी पडणारे कर्मचारी नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावेत. ते न दिल्यास १ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरणने पन्हाळा नगरपरिषदेस पत्र पाठवून दिल्याचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी सांगितले. तसेच याप्रश्नी नगरपालिकेने २१ आॅक्टोबरला विशेष सभा आयोजित केली आहे.
पन्हाळा शहर आणि पन्हाळ्यावर येणारे पर्यटक यांचा विचार करून १९८० साली सध्या वापरात असलेली पाणीपुरवठा योजना शासनाने सुरू केली. कासारी नदीवरून पाच टप्प्यांत पाणी खेचून पन्हाळा शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. या सर्व टप्प्यांत शासनाचे पंधरा कर्मचारी, दोन ज्युनिअर इंजिनिअर, एक मुख्य इंजिनिअर व चार प्लंबर, असे २२ कर्मचारी या योजनेवर काम करीत होते. पन्हाळा शहरात या पाणी योजनेवर केवळ ७०० कनेक्शनधारक झाल्याने ही पाणीपुरवठा
योजना सुरुवातीपासूनच तोट्याची निघाली.
तोट्यात चाललेल्या या योजनेचे बरेच वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचारी दुसऱ्या पाणी योजनेकडे वर्ग केले व केवळ १५ कर्मचारी शिफ्टनुसार काम करू लागले. या योजनेत सलग १८ तास पंपिंग झाले तरच पन्हाळावासीयांना पाणी केवळ एक तास मिळू शकते; पण वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित स्वरूपात होऊ लागला. शेतीसाठी पाणी खेचणारे शेतकरी यांच्यासाठी सिंगल फेज पद्धतीचा अवलंब. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून पन्हाळावासीयांना एक दिवसा आड ३० मिनिटे पाणी मिळू लागले. यासाठी नगरपरिषदेने पाठपुरावा करून विनय कोरे यांच्या फंडातून १४ लाख रुपये वीज कंपनीला पन्हाळा ते
आसुर्ले जॅकवेलपर्यंत स्वतंत्र वीज मिळावी म्हणून भरले. तथापि, आजअखेर या कंपनीने हे काम केलेले नाही.
३५ वर्षांपूर्वीची ही गळकी, वारंवार बंद पडणारी योजना नगरपरिषदेच्या माथी मारण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. तथापि, नगराध्यक्ष असीफ मोकाशी यांनी तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ही योजना हस्तांतरित होण्याचे थांबविले व नवी योजना मंजूर करून घेतली. ही योजना उत्रे ते पन्हाळा अशी होती. यासाठी लोकवर्गणी ५८ लाख रुपये १० टक्क्यांप्रमाणे भरली गेली. नव्या शासनाने जुन्या शासनाची सर्व कामे थांबविली, रद्द केली. त्यात ही योजना लालफितीत अडकली.
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पाणीपट्टी दर हजार लिटरसाठी पन्हाळावासीय भरतात, तर ३५ वर्षांपूर्वीपासून पाण्याचे मीटर स्वखर्चाने बसवून घेतात. इतके असूनदेखील जीवन प्राधिकरणचे उपअभियंता पाटील यांनी नगरपालिका प्रशासनास पत्र पाठवून कर्मचारी द्या, अन्यथा १ नोव्हेंबरपासून ही योजना बंद करीत आहोत, असे कळविले आहे. याबाबत नगरपरिषदेने विशेष सभा २१ आॅक्टोबरला बोलविल्याचे नगराध्यक्ष असीफ मोकाशी यांनी सांगितले.
योजना पालिका चालवेल अन्यथा बंद
पन्हाळा शहरवासीयांचा सहनशीलतेचा अंदाज जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आल्याने कर्मचारी अपुरे असल्याचे कारण देत ही पाणीपुरवठा योजना एक तर नगरपरिषद चालवेल, अन्यथा बंद करून टाका, असा सुरुवातीला तोंडी आदेश दिला.
दरम्यान, या पाणीपुरवठा योजनेच्या दोन मोटारी जळाल्या. देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. यावेळी नगरपरिषदेने १२ लाख रुपये आमदार फंडातून विशेष निधी मंजूर करून घेऊन तातडीने दोन नव्या मोटारी आणून बसविल्या.
सध्या जवळपास कर्मचाऱ्यांचा पगार सोडला, तर पाणी योजनेची देखभाल दुरुस्ती नगरपरिषदच करते.