चांदी दरातील घसरण ‘रौप्यनगरी’च्या मुळावर

By Admin | Updated: January 10, 2015 00:18 IST2015-01-09T22:04:57+5:302015-01-10T00:18:19+5:30

मंदीचे वातावरण : धडीमाल उत्पादकांना प्रतिकिलो ११०० रुपयांचा तोटा, धडीमाल उत्पादक हैराण

On the other hand, silver was down by Rs | चांदी दरातील घसरण ‘रौप्यनगरी’च्या मुळावर

चांदी दरातील घसरण ‘रौप्यनगरी’च्या मुळावर

तानाजी घोरपडे - हुपरी -चांदीच्या दरामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परिणामी रौप्यनगरी परिसरातील संपूर्ण चांदी उद्योगामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचे मंदीचे वातावरण पसरले असून दागिने बनविणाऱ्या धडीमाल उत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या चांदीचा प्रतिकिलो भाव ३५ ते ३८ हजारांच्या घरातच खेळत असल्याने धडीमाल उत्पादकाला प्रतिकिलो ११०० रुपयांचा तोटा होत आहे.
परिसरातील चांदीचे दागिने तयार करणाऱ्या धडीमाल उत्पादकांच्या मिळकतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. दागिने तयार करण्यासाठी मिळणाऱ्या प्रति किलोच्या मजुरीवर व वेस्टेजमध्ये उत्पादन खर्चही भागत नाही. परिणामी प्रति किलो सुमारे ११०० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. चांदीच्या दरामध्ये झालेली घसरण धडीवाल्यांचे कंबरडे मोडणारी आहे. अशाही परिस्थितीत अनेकांनी दागिने निर्मिती सुरूच ठेवली आहे. चांदीचा किलोचा भाव ५५ ते ६० हजारांच्या घरात होता. त्यावेळी धडी उत्पादकाला चार पैसे मिळत होते. त्यामध्ये तो समाधानी असायचा. मात्र सध्या भाव ३५ ते ३८ हजारांच्या घरात खेळतच असल्याने दरातील फरकामुळे फक्त तुटीचा मेळ घातल्यास प्रतिकिलो ११०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. चांदीचा एक दागिना घडविण्यासाठी वीसहून अधिक कारागिरांच्या हातून विविध प्रक्रिया करण्यात येतात. यामध्ये आटणी, ओढणीपासून पॉलिशपर्यंत सर्व घटकांना वेगवेगळी तूट अथवा मजुरी द्यावी लागते. चांदीचा भाव उतरल्याने या घटकांनी मजुरी व तुटीत वाढ केली आहे. आधीच प्रति किलो ११०० रुपयांचा तोटा होत आहे. चांदी उद्योगाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या धडीवाल्यांची मोठ्या प्रमाणात फरफट होत असल्याने धडी उत्पादक सध्या विशिष्ट प्रकारच्या गंभीर समस्यांनी ग्रासला गेल्याचे चित्र आहे. बॅँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे अशक्य होऊन गेल्याने बॅँकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळे धडीमाल उत्पादक हैराण होऊन गेला आहे.


बाजारपेठच ‘हायजॅक’
सध्या याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. पारंपरिक पद्धतीने अद्यापही येथे दागिने बनविण्यात येत असल्याने व कोणत्याही प्रकारचे अत्याधुनिक व नावीन्य नसल्याने आता देशातील बाजारपेठेतून केवळ २० ते २५ टक्केच मागणी होऊ लागली आहे.
तमिळनाडूतील ‘सेलम’च्या व्यावसायिकांनी बाजारपेठेतील बदलती परिस्थिती ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी, नावीन्यपूर्ण बदल, याबाबतचा सखोल परिपूर्ण अभ्यास करून आवश्यक तेथे बदलही करून दागिन्यांची निर्मिती केली.
त्याबाबतचे चांगले मार्केटिंगही केले. परिणामी, देशातील संपूर्ण बाजारपेठच त्यांनी ‘हायजॅक’ केल्याने ‘सेलम’च्या दागिन्यांना आता देशातील बाजारपेठेतून ६० ते ७० टक्के मागणी आहे.


नवीन कामगार येत नाहीत
धडीमाल उत्पादकाला मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्यातून तो कारागिरांना अपेक्षित मजुरी व सोयीसुविधा देऊ शकत नाही. या व्यवसायात कमी मोबदला मिळतो म्हणून नवीन कारागीर तयार होत नाहीत. सध्या महिलांच्या जिवावरच हा व्यवसाय तग धरून आहे. यापूर्वी हुपरीतील तरुण पदवीधर झाला तरीही तो नोकरीच्या मागे न लागता चांदी व्यवसायालाच महत्त्व देत असे, आता याउलट परिस्थिती पहावयास मिळत आहे.
अगदी दहावी-बारावी झालेला तरुणदेखील या व्यवसायाची परिस्थिती पाहून तो पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हेल्पर म्हणून कामावर जाणे पसंत करतो आहे. याठिकाणी मिळणाऱ्या पगारापेक्षाही चांदी व्यवसायातील कुशल कामगाराला कमी पगार मिळतो. त्यामुळे या व्यवसायात नवीन कामगार तयार झालेले नाहीत. जुने कामगार वार्धक्यामुळे निवृत्त होत आहेत, तर नवीन तरूण पिढी या व्यवसायापासून दूर जात आहे. परिणामी, अशा परिस्थितीत चांदी व्यवसायाचे भवितव्य अंध:कारमय होत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


रौप्यनगरीचा दबदबा
संपूर्ण भारतात चांदी दागिने निर्मितीचा व्यवसाय हा हुपरीसह सेलम, आग्रा, मथुरा, राजकोट या शहरांमध्ये प्रामुख्याने केला जातो.
सध्या हुपरीमध्ये स्थानिक दागिन्यांबरोबरच अन्य बाजारपेठांचे दागिने मोठ्या प्रमाणात आयात करून देशातील सर्वच बाजारपठांमध्ये ते वितरित केले जातात.

काही वर्षांपूर्वीपर्यंत रौप्य नगरीच्या दागिन्यांना देशातील सराफ बाजारपेठेवरून मोठ्या प्रमाणात मागणी असायची.
हुपरीचा दागिना म्हटले की, मजबूत, टिकाऊ व गुणवत्ता प्राप्त केलेला दागिना म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे एकूण बाजारपेठेतील ७५ टक्के वाटा हा केवळ एकट्या रौप्यनगरीच्या दागिन्यांचा होता.

Web Title: On the other hand, silver was down by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.