इचलकरंजीला पाणी देण्यास वारणाकाठच्या गावांचा विरोध
By Admin | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-07T07:30:31+5:302016-06-07T07:32:05+5:30
आंदोलनाची तयारी : ग्रामपंचायतींना समर्थन देण्याची हाक

इचलकरंजीला पाणी देण्यास वारणाकाठच्या गावांचा विरोध
आयुब मुल्ला-- खोची --वारणा नदीतून इचलकरंजी शहराला अमृत योजनेतून पाणीपुरवठ्याला विरोध दर्शवण्यासाठी वारणाकाठच्या सर्व गावांतील ग्रामपंचापतींकडे वारणा बचाव युवा कृती समितीने आंदोलनासाठी सहकार्य मागितले आहे. आपली शेती ज्या पाण्यावर अवलंबून आहे ते देऊ नये व आपली विकासाची घडी विस्कटू नये हाच उद्देश त्यामागे आहे.
इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. ती नदी दूषित झाली आहे. यासाठी पर्याय म्हणून लोकप्रतिनिधींनी वारणा नदीतून पाईपलाईनने दानोळी हद्दीतून वारणा नदीच्या पात्रातून इचलकरंजीला पाणी नेण्याचा घाट घातला आहे. त्यास परिसरातील ग्रामस्थांनी सुरुवातीपासून विरोध सुरू केला. पाणी देण्याविरोधात दोनवेळा आंदोलन केले. परिसरातील गावांनीही त्यास प्रतिसाद दिला. आता मात्र त्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वारणा बचाव युवा कृती समिती त्यासाठी सक्रिय झाली आहे. समितीने त्यासाठी वारणा काठावरील सर्व गावांच्या ग्रामपंचायतींना निवेदन देऊन आंदोलनास समर्थन देण्याची हाक दिली आहे. यासंदर्भातील हातकणंगले तालुक्यातील सर्व वारणाकाठालगतच्या ग्रामपंचायतींना निवेदन दिले आहे.
वारणा नदीवर बांधण्यात आलेले चांदोली धरण वारणा खोऱ्याचा व लाभक्षेत्राचा विकास साधण्याच्या हेतूने बांधण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने काही योजनाही शासनाने करण्याचे सूचित केलेले होते. परंतु त्याची अद्याप शासनाने पूर्तता केलेली नाही. त्याची मुदत सन २०४९ पर्यंत आहे. अशा कारणामुळे धरणात पाणीसाठा नेहमी दिसतो; पण योजना कार्यान्वित झाल्या तर पाण्याचा तुटवडा दिसल्याशिवाय राहणार मग भविष्याचा विचार करता वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी देणे नुकसानीचे ठरणार आहे, असा प्रबोधनात्मक मुद्दाही समिती गावागावांत भेटीतून मांडत आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे. यावरूनच पाणी योजनेला विरोध करण्यासाठी वारणाकाठ सरसावला आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. १०) वारणाकाठची गावे बंद राहणार आहेत.