केवळ विश्वासार्हतेमुळे ‘ते’ घडले नाही

By Admin | Updated: November 14, 2015 01:15 IST2015-11-14T00:59:35+5:302015-11-14T01:15:45+5:30

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे.

Only 'because of credibility' has not happened | केवळ विश्वासार्हतेमुळे ‘ते’ घडले नाही

केवळ विश्वासार्हतेमुळे ‘ते’ घडले नाही

कोल्हापूर : ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून सर्व पदे घ्यावीत, भाजप त्यास बाहेरून पाठिंबा देईल त्यासाठी सहकार्य करावे, असा प्रस्ताव भाजपकडून आला होता. त्यावर पक्षश्रेष्ठी शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे यांच्याबरोबर सविस्तर चर्चाही झाली होती; परंतु विश्वासार्हतेचा प्रश्न होता, त्यामुळेच हे घडू शकले नाही, असा खुलासा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
राष्ट्रवादीच्या सहकार्याने भाजपचा महापौर करण्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न सोडून दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्री पाटील यांनी ‘घोडेबाजार करणार नाही, विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू; परंतु निवडणूक बिनविरोध होणार नाही,’ असे वक्तव्य केले आहे. त्याबाबत पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी जी भूमिका घेतली त्याचे स्वागत आहे. ‘अध्यात्म व चमत्कार’ हे शब्द कानावर येताच मी संभ्रमित झालो होतो. घोडेबाजाराचा अनुभव अंगावर काटा आणणारा होता. जर दादांची मनापासून ही भूमिका असेल तर सत्तारूढ आघाडीबरोबर शहराच्या विकासासाठी व इतर प्रकल्प आणण्यासाठी मनापासून साथ द्यावी. त्याचे श्रेय त्यांनाच देऊ. शासनाकडून निधी आणण्याकरीता आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. नगरसेवकांमध्ये भेदाभेद केला जाणार नाही.
चंद्रकांत पाटील हे भला व चांगला माणूस आहे. याबाबत आजही माझे मत त्यांच्याबद्दल कायम आहे; परंतु काही शक्ती मतभेद व गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करत असतात. दादा आमची भूमिका समजून घेतील. उद्या होणाऱ्या निवडणूक बिनविरोध करतील. शहराच्या विकासासाठी प्रचंड निधी आणतील, असा माझा विश्वास आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Only 'because of credibility' has not happened