शिष्यवृत्तीसाठी एक लाख विद्यार्थी पात्र
By Admin | Updated: December 17, 2014 22:54 IST2014-12-17T22:27:12+5:302014-12-17T22:54:28+5:30
‘आम आदमी’ : प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापकांना सूचना; सर्वाधिक लाभार्थी कागल तालुक्यातील

शिष्यवृत्तीसाठी एक लाख विद्यार्थी पात्र
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या आम आदमी विमा योजनेतून सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील एक लाख दोन हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याबाबत आॅनलाईन अर्ज भरून घेण्याची सूचना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
खेड्यांमधील भूमिहीन, पाच एकरपेक्षा कमी जिरायती आणि अडीच एकरपेक्षा कमी बागायती क्षेत्र असलेला १८ ते ५९ वयोगटांतील शेतकरी आम आदमी योजनेसाठी पात्र ठरू शकतात. पात्र शेतकऱ्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून योजनेचा लाभ दिला जातो. पात्र लाभार्थीचा विमा हप्ता शासन भरत असते. या योजनेतील लाभार्थीच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना दरमहा ३०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
दरम्यान, योजनेची सविस्तर माहिती नसणे, दरमहा शिष्यवृत्तीची रक्कम न मिळणे, आदी कारणांमुळे बहुतांश आम आदमी या योजनेपासून दूर राहिला आहे. मात्र, या योजनेची प्रभावी जागृती करीत चालू शैक्षणिक वर्षात पात्र विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी प्रयत्न करीत आहेत.
यासाठी त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी यांची नुकतीच बैठक घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच आॅनलाईन अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे.
पहिल्या टप्प्यात तालुका आणि शाळानिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार झाली आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ७३६ शाळा आहेत. शाळानिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार झाल्यामुळे अंमलबजावणी करणे सोयीचे होत आहे. आतापर्यंत २८ हजार १०३ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरून दिले आहेत. अजूनही अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शिष्यवृत्तीसाठी पहिल्यांदा आम आदमी योजनेचा लाभार्थी असणे बंधनकारक आहे. आम आदमीचे सर्वाधिक लाभार्थी कागल तालुक्यात आहेत. परिणामी, पात्र विद्यार्थी संंख्याही कागल तालुक्यातच अधिक आहे. लाभार्थीच कमी असल्यामुळे ९९८ इतकी कमी पात्र विद्यार्थी संख्या गगनबावडा तालुक्यात आहे.
तालुकानिहाय पात्र विद्यार्थी व शाळा
तालुकाशाळाविद्यार्थी
करवीर९९९५१८,
कागल८०१६६७९,
पन्हाळा८०११९३९,
शाहूवाडी४९६०००,
हातकणंगले ६९१९०८५,
शिरोळ६७७२२९,
राधानगरी६०६४२७,
भुदरगड४९३६३३,
गगनबावडा१८९९८,
आजरा३६२१००,
गडहिंग्लज६३८७४०,
चंदगड६६१०२४०.
अधिकाधिक पात्र मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे. शाळांचे शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांनाही सूचना दिल्या आहेत. वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.
- किरण कुलकर्णी,
उपजिल्हाधिकारी (महसूल)