हरकतींवरच अधिकाऱ्यांची ‘हरकत’
By Admin | Updated: August 27, 2015 00:21 IST2015-08-27T00:21:24+5:302015-08-27T00:21:24+5:30
महापालिका निवडणूक : तुम्ही फक्त तक्रार मांडा, आम्ही बघून घेतो

हरकतींवरच अधिकाऱ्यांची ‘हरकत’
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या नव्या प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकतींवर बुधवारी ताराबाई पार्कमधील महापालिकेच्या मुख्य निवडणूक कार्यालयात सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते. ‘तुम्ही फक्त तक्रार मांडा, आम्ही बघून घेतो, निर्णय नंतर सांगतो, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेत हरकतीवरील सुनावणींची ही प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण केली. अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर हरकतदारांचे समाधान झाले नाही. आठ दिवसात हरकतींवर निर्णय देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.नव्या प्रभाग रचनेसंदर्भात सुमारे १४५ हरकती प्राप्त झाल्या होत्या. बुधवारी सकाळी मुख्य निवडणूक कार्यालयात ११ वाजतासुरू झालेली सुनावणी सुमारे साडेसहा तास चालली. यावेळी निवडणूक कार्यालयाबाहेर हरकतदारांसह इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. सुरुवातीच्या कालावधीत प्रत्येक हरकतदाराला स्वतंत्रपणे बोलावून त्यावर सुनावणी घेतली जात होती; पण नंतर जादा वेळ लागत असल्याचे लक्षात येताच दुपारी बारा वाजल्यानंतर प्रत्येक प्रभागातील एकत्रित सुनावणी घेण्यात आली.
या हरकतीमध्ये प्रभाग आरक्षण बदलण्याबाबत तसेच प्रभाग रचनेमध्ये एखादी गल्ली अथवा काही घरे दुसऱ्या प्रभागात गेल्याच्या, तसेच भौगोलिक संलग्नता नसल्याच्या हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेल्या हरकतींची सुनावणी प्रभाग क्र. १ ते ८१ अशा प्रभागानुसार संबंधित हरकतीदार, संबंधित वॉर्ड अधिकारी व सर्व्हेअर यांच्यासमोर घेण्यात आली; पण सुनावणीवेळी ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्याबाबत अनेकांनी आक्षेप घेतला. फक्त ‘देंगे, दिलायेंगे’ अशीच उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली. अनेकांनी प्रभाग रचनेत, नव्या आरक्षणात भौगोलिक संलग्नता नसल्याचा मुद्दा पुढे रेटला; पण त्यावर अधिकाऱ्यांनी कोणतीही चर्चा न होताच हा मुद्दाच निकालात काढला.
हात आपटून दाद मागितली
प्रभाग क्रमांक ७३ फुलेवाडी रिंग रोड, प्रभाग क्रमांक ८० कणेरकरनगर-क्रांतिसिंह नाना पाटील नगर, प्रभाग क्रमांक ८१ नाना पाटील नगर-जीवबा नाना पार्क या सलग तीन प्रभागांवर आरक्षण पडल्याने हा अन्याय आहे, हे चुकीचे आरक्षण बदलावे, अशी मागणी एका हरकतदाराने टेबलावर हात आपटून केली; पण त्यास सचिवांनी आक्षेप घेतला. हात आपटून सांगण्याची गरज नाही, असे त्यांनी खडसावून सांगितले. हीच परिस्थिती प्रभाग क्रमांक ६६ स्वातंत्र्यसैनिक वसाहतीच्या हरकतदाराकडून झाली. मतदार संख्या आणि प्रभाग रचनेचा नकाशा करताना चूक झाल्याचे सांगताना हरकतदाराने टेबलावर हात आपटला; पण त्यालाही सचिवांनी आक्षेप घेतला. नकाशा करताना अधिकारी चुकले असतील; पण मी अंतिम निर्णय घेणार आहे, मी हायकोर्ट आहे; त्यामुळे इतका आटापिटा करण्याची गरज नाही, असे त्यांना बजावले.
काजू-बदामांची मेजवानी
सुनावणीवेळी अधिकारी समोर टेबलावर ठेवलेल्या प्लेटमधील मसाले काजू-बदाम तोंडात टाकत हरकतदाराच्या प्रश्नावर मोजक्याच शब्दांत उत्तरे देत होते. ही स्थिती दिवसभर होती; त्यामुळे प्रत्येक हरकतदारासमोर ही काजू-बदामांची मेजवानी सुरूच होती. हरकतदारांसमोरील अधिकाऱ्यांची सुरू असणारी मेजवानी अनेकांना खटकली.
आजी-माजी नगरसेवकांच्याही हरकती
महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, पक्षप्रतोद चंद्रकांत घाटगे, नगरसेविका अपर्णा आडके, नगरसेवक सतीश लोळगे, सुनील पाटील, भूपाल शेटे, आर. डी. पाटील, प्रकाश पाटील, तसेच माजी नगरसेवक सुनील मोदी, पांडुरंग आडसुळे, मधुकर काकडे, आशिष ढवळे, नाना जरग, आदींंनी हरकती घेतल्या होत्या.
उपस्थित अधिकारी
ही सुनावणी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी घेतली. या सुनावणीवेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, राज्य निवडणूक आयोगाचे अव्वर सचिव एन. जी. वागळे, कक्ष अधिकारी अतुल जाधव, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे व संबंधित सर्व्हेअर उपस्थित होते.