वहिवाट अडवली, चाळीस एकर उसाची तोड खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST2021-02-20T05:09:42+5:302021-02-20T05:09:42+5:30
एकीकडे जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची चळवळ उभी राहिली असताना दुसरीकडे मात्र, अशी अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त ...

वहिवाट अडवली, चाळीस एकर उसाची तोड खोळंबली
एकीकडे जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची चळवळ उभी राहिली असताना दुसरीकडे मात्र, अशी अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. उचगाव येथील जुन्या विजापूर रस्त्यावर उचगाव रेल्वे गेट क्रमांक २५ होत आहे. गेट अपुरे असल्याने दक्षिणेकडील शेतकऱ्यांना ये-जा करणे, उसाची वाहतूक करण्याची अडचण निर्माण झाली होती. येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने अंडर ब्रीजचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या अंडर ब्रीजखालून ऊस वाहतूक करणे सोपे झाले आहे. दक्षिणेकडील वहिवाटीच्या रस्त्यावरून उसाची वाहतूक होते. ही वहिवाट काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातूनच सोडल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच सोय झाली होती. मात्र यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीचे नुकसान होत असल्याच्या कारणास्तव येथील वाहतूक रोखली आहे. हा वहिवाटीचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी काम सुरू असतानाच हे कामही थांबले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांच्या ऊसतोडी थांबल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदार यांना तक्रार दिली आहे तहसीलदारांनी येथील मंडल अधिकाऱ्यांना याबाबतची चौकशी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवारी येथील पाहणी झाल्यानंतर त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
फोटो : १९ उचगाव रस्ता
ओळ-:
उचगाव येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेले रेल्वे अंडर ब्रीजचे काम थांबले आहे. त्यासाठी सर्व शेतकरी एकत्र आले आहेत. छाया : अनिल निगडे