आता जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST2021-05-07T04:26:30+5:302021-05-07T04:26:30+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी थांबलेली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची चर्चा आता ...

आता जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची चर्चा
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी थांबलेली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बदल व्हावा अशी इच्छा असणाऱ्यांनी पुन्हा उचल खाल्ल्याने या दोन दिवसात याबाबत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.
जानेवारी २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्ष पूर्ण झाले आहे. तोपर्यंत दोन्ही मंत्री ‘गोकुळ’च्या जोडण्यांमध्ये लागल्याने हा विषय मागे पडला. कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल केला जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी याआधी अनेकवेळा सांगितले आहे.
त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये घवघवीत यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे जोरदार वातावरण तयार झाले आहे. अशातच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी इच्छुकांकडून सुरू आहे.
गुरुवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. परंतु चर्चेचा तपशील कळलेला नाही. काही इच्छुक सदस्यांनीही पालकमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. ग्रामविकासमंत्री मुश्रीफ हे मुंबईत असल्याने ते आल्यानंतर दोन दिवसात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी २०२२ मध्ये हाेणे अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात विधानपरिषदेचीही निवडणूक आहे. त्यामुळे कालावधी कमी होत असल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे. म्हणूनच लवकरात लवकर बदल व्हावा यासाठी आता इच्छुक आग्रही आहेत.
चौकट
विरोधकांची भीती नाही
सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्याच मतदार संघासाठी निधी घेण्याचा अतिरेकी कल, यामुळे सदस्य नाराज आहेत. त्यामुळे ही नाराजी वाढू नये यासाठीही नेत्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे. ‘गोकुळ’मध्ये ज्या पध्दतीने मुश्रीफ-पाटील जोडीने धमाकेदार विजय संपादन केला, त्यातून त्यांनी मोठा संदेश दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी बदलात भाजप काही तरी वेगळे करण्याच्या मनस्थितीत आता उरली आहे असे वाटत नाही. जिथे ३६०० ठरावधारकांच्या गोकुळची निवडणूक घेतली, तिथे ६७ सदस्य असलेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी काहीच अडचण सांगू नका, असे इच्छुकांचे म्हणणे आहे.