शेतीसाठी आतापासूनच उपसा

By Admin | Updated: September 5, 2015 00:10 IST2015-09-05T00:10:50+5:302015-09-05T00:10:50+5:30

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट : गतवर्षीपेक्षा ४० टक्के पाऊस कमी

From now on, pottage for agriculture | शेतीसाठी आतापासूनच उपसा

शेतीसाठी आतापासूनच उपसा

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात दुष्काळाची छाया गडद होत असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातही दुष्काळाचे सावट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणांतून एप्रिल, मे महिन्यांपर्यंत पुरेल एवढे पाणीसाठे उपलब्ध असले तरी सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा आतापासूनच करावा लागत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर मात्र ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची दाट शक्यता असून, जलसंपदा विभाग आतापासूनच नियोजनात व्यस्त आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये थोडा पाऊस झाला. त्यातून राधानगरी, कडवी, कोदे, घटप्रभा, कासारी ही पाच धरणे १०० टक्के भरली आहेत; तर अन्य महत्त्वाची धरणे ७५ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारे राधानगरी धरण पूर्ण भरले असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
आजची परिस्थिती पाहता जिल्ह्यात पाण्याची कमतरता नसली तरी आणखी चार-पाच महिन्यांनी मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा अंदाज आहे. त्याला कारण पावसाने दिलेली ओढ हे ठरू शकते.
यंदा कोल्हापूरकरांना पावसाळा जाणवलाच नाही, असा पाऊस झाला. गेल्या वर्षी १ सप्टेंबरला १७७२.३९ मिलिमीटर पाऊस झाला होता, तो यावर्षी याच तारखेला १०९५.२१ मिलिमीटर इतका नोंदला गेला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी पडला आहे.
पावसाची ओढ कायम राहिली तर मात्र कोल्हापूरची सुद्धा काही खैर नाही. सर्वसाधारण कोल्हापूर जिल्ह्यात १५ आॅक्टोबरनंतर नदीतील पाण्याचा उपसा करण्याची गरज शेतकऱ्यांना भासते. परंतु, यंदा पाऊस कमी झाल्याने दीड महिना आधीच पाणी उपसा करावा लागत आहे. सर्वच नद्यांवर मोटारी सुरू झाल्या आहेत. यावेळी नदीतून लवकर उपसा सुरू झाल्यामुळे पाण्याचा साठा जलदगतीने कमी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते. सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात एक-दोनवेळा मोठा पाऊस होण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी सध्या तरी काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगतात. परंतु, सप्टेंबर व आॅक्टोबरमध्येही पाऊस झाला नाही, तर भविष्यातील धोका ओळखून नियोजन करावे लागणार आहे.

सर्व नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बरगे दरवर्षी पावसाळ्यात काढले जातात. यंदाही ते काढले आहेत, परंतु पाऊस कमी झाल्याने बरगे पूर्ववत बसविले जाणार आहेत. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात पाण्याची कमतरता नाही. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने आतापासूनच शेतीसाठी नदीतून उपसा सुरू आहे.
- बी. एस. घुणकीकर, उपविभागीय अधिकारी दूधगंगा पाटबंधारे उपविभाग

Web Title: From now on, pottage for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.