आता शंभर पटास मुख्याध्यापक मिळणार
By Admin | Updated: August 31, 2015 00:17 IST2015-08-31T00:17:02+5:302015-08-31T00:17:02+5:30
अतिरिक्त शिक्षक प्रमाण कमी होणार

आता शंभर पटास मुख्याध्यापक मिळणार
कोल्हापूर : राज्यातील उच्च प्राथमिक शाळांना २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार आता शंभर पटास मुख्याध्यापकपद मंजूर होणार आहे. या शासन निर्णयात पटाचे निकष बदलल्यामुळे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण कमी होऊन नवीन भरती करावी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व सरचिटणीस विजय भोगेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.बालकाचा शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना १५० पटास आणि सहावी ते आठवीच्या वर्गांना शंभर पटास मुख्याध्यापकपद अनुज्ञेय आहे. मात्र, इयत्ता पहिली ते सातवी अथवा पहिली ते आठवीच्या संयुक्तीकरीत्या पटसंख्या शंभरच्या वर असेल तर, मुख्याध्यापक पद द्यावे की देऊ नये याबाबत स्पष्ट निर्देश नव्हते. इयत्ता सहावी ते आठवीला शंभर पटास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय असेल तर, इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांनाही शंभर पटाच्या वर मुख्याध्यापकपद मिळालेच पाहिजे, याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव नंदकुमार, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. शासन निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या वर्गांना ६० पर्यंत दोन व त्यापुढील प्रत्येक ३० पटास एक शिक्षक व सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ ला एक शिक्षक मिळणार आहे, तसेच मुख्याध्यापकपद कमी करताना दहा टक्के पटाची सवलत दिली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत फार कमी होणार असून, उलट राज्यात सुमारे १५ ते २० हजार शिक्षक पदे निर्माण होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष पाटील, सरचिटणीस भोगेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. (प्रतिनिधी)
शासन निर्णयानुसार पहिली
ते पाचवीच्या वर्गांना
६० पर्यंत दोन
त्यापुढील प्रत्येक ३० पटास एक शिक्षक व सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ ला एक शिक्षक मिळणार