आता ई-पासपोर्टही मिळणार लवकरच !
By Admin | Updated: August 30, 2015 01:22 IST2015-08-30T01:22:15+5:302015-08-30T01:22:15+5:30
पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या अर्जदाराला निश्चित कालावधीत पासपोर्ट मिळावा म्हणून आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबिले आहे. पासपोर्टच्या संकेतस्थळाची भाषा साधी, सोपी आणि

आता ई-पासपोर्टही मिळणार लवकरच !
पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या अर्जदाराला निश्चित कालावधीत पासपोर्ट मिळावा म्हणून आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबिले आहे. पासपोर्टच्या संकेतस्थळाची भाषा साधी, सोपी आणि सरळ केली आहे. सातत्याने नागरिकांशी संपर्क येत असल्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेत असलेले संकेतस्थळ आम्ही आता मराठीत आणणार आहोत.
महत्त्वाचे म्हणजे आता पासपोर्टमध्ये ई-पासपोर्टचीही भर पडणार असून, केंद्रासोबतचे त्याचे ई-टेंडरिंग सुरू केले आहे. ई-पासपोर्टसोबत एक चीप दिली जाणार असून, बुकलेटमध्ये असणाऱ्या चीपमध्ये पासपोर्टधारकाची संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे.
एकंदर काय, तर पासपोर्ट विनाविलंब अर्जदारांच्या हाती यावा यावर आमचा अधिक भर आहे, असे विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुळकर्णी (आय.एफ.एस) यांनी सांगितले. ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’मध्ये खास संवादादरम्यान त्या बोलत होत्या.
पासपोर्टची प्रक्रिया खूपच किचकट आहे, याबाबत काय सांगाल?
नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पासपोर्ट काढणे सहज, साधे आणि सोपे झाले आहे. पासपोर्टसंबंधीच्या संकेतस्थळावर स्वत:चे लॉग-इन करून तुम्हाला पहिल्यांदा तुमचे खाते सुरू करावे लागते. त्यानंतर संबंधित संकेतस्थळावर पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा, इथपासून पुढील सर्व बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी संबंधिताने पासपोर्टचे संकेतस्थळ किमान दोन ते तीनवेळा वाचले तरी त्याला सर्व व्यवस्थित कळेल; शिवाय पासपोर्ट काढताना अडचणी येणार नाहीत.
पासपोर्ट कार्यालयाच्या यापूर्वी काय अडचणी होत्या ?
देशभरात पासपोर्टची तब्बल ३७ कार्यालये आहेत. शिवाय आता पासपोर्ट कार्यालयांचे जाळे वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पूर्वी नवे तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत होती. शिवाय नियमांची काटकोरपणे अंमलबजावणी होत नव्हती. मनुष्यबळ कमी होते. कार्यालयांची संख्या कमी होती. त्यामुळे काम जिकिरीचे होते.
आता देशभरात पासपोर्टचे जाळे कसे विस्तारले आहे ?
पासपोर्ट कार्यालयांसमोरील समस्यांचा डोंगर लक्षात घेता सरकारने यात आवर्जून लक्ष घातले. पासपोर्टची कार्यालये अत्याधुनिक व्हावीत, यासाठी सरकारने हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मार्ट गव्हर्नमेंटशी संपर्क साधला. लोकांसाठी ही प्रक्रिया साधी, सोपी आणि सरळ करा, असे त्या संस्थेला सरकारने सांगितले. पासपोर्ट प्रक्रिया पादर्शक करण्यासाठी त्यांची मदत घेतली. आम्ही त्यांना ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्याचा त्यांनी अहवाल तयार केला आणि आम्हाला सादर केला. त्यानंतर आम्ही पासपोर्ट कार्यालयाच्या ‘फ्रंट लाइन’ कामासाठी निविदा मागविल्या. निविदांनंतर हे काम टीसीएसला (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) देण्यात आले. मग आम्ही पासपोर्ट कार्यालयात पेपरलेस मुव्हमेंट सुरू केली. शिवाय ही सगळी पद्धत संगणकीय करण्यात आली.
पासपोर्ट कार्यालयात अद्यापही दलालांचा वावर असतो?
आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही दलालांना वावच ठेवलेला नाही. कारण आमची सगळी पद्धत संगणकीय झाली आहे. पासपोर्टची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. आमचे संकेतस्थळ साधे, सोपे आणि सरळ आहे. सर्वसामान्यांना समजेल अशी भाषा संकेतस्थळासाठी वापरण्यात आली आहे. आता तर संकेतस्थळ मराठी भाषेत आणण्याचा विचार सुरू आहे. राहिला प्रश्न दलालांचा, तर सगळा कारभार पारदर्शक करूनही जर नागरिक दलालांकडे जात असतील तर ती त्यांची चूक आहे.
पासपोर्ट प्रक्रियेतील पोलीस व्हेरिफिकेशनचा का त्रास होतो ?
अर्ज केल्यानंतर २५ दिवसांत पासपोर्ट तुमच्या हातात येईल, अशी व्यवस्था आम्ही केली आहे. आता तर पासपोर्ट प्रक्रियेतील पासपोर्ट व्हेरिफिकेशनही आॅनलाइन झाले आहे. मुंबईमध्ये अंधेरी, मालाड आणि लोअर परळ येथे आमची कार्यालये आहेत. त्याचे ‘फ्रंट लाइन’चे काम टीसीएस पाहात आहे. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात तुम्हाला वेळ दिली जाते. संदर्भ क्रमांक दिला जातो. त्यावेळेत तुम्हाला संबंधित कार्यालयात उपस्थित राहावे लागते. इथपर्यंतचे काम ‘फ्रंट लाइन’द्वारे होते. त्यापुढे दुसऱ्या टप्प्यात पासपोर्ट कार्यालयाचे अधिकारी अर्जदाराची कागदपत्रे तपासतात. त्यांच्या हाताचे ठसे घेतात. म्हणजे येथे जी आवश्यक आहे ती कागदपत्रे तपासल्यानंतर दुसरा टप्पा संपतो. तिसऱ्या टप्प्यात पासपोर्ट कार्यालयाचे अधिकारी अर्जावर योग्य निर्णय घेतात. आणि त्यानंतर संबंधित अर्जदाराची माहिती व्हेरिफिकेशनसाठी आॅनलाइन पद्धतीने पोलिसांकडे पाठवली जाते. ही सर्व प्रक्रिया विनाअडथळा पार झाली तर २५ दिवसांत पासपोर्ट मिळतो. मात्र पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आढळल्यास या प्रकियेला विलंब होणे स्वाभाविक आहे. त्यात आम्ही काहीच करू शकत नाही.
सर्वसाधारण पासपोर्ट प्रक्रिया आणि तात्काळ पासपोर्ट प्रक्रिया यात काय फरक?
सर्वसाधारण पासपोर्ट प्रक्रियेसाठी अर्जदाराला दीड हजार रुपये अदा करावे लागतात. तर तत्काळ पासपोर्टसाठी अर्जदाराला ३ हजार ५०० रुपये अदा करावे लागतात. सर्वसाधारण प्रक्रियेत पासपोर्ट पंचवीस दिवसांत अर्जदाराच्या हाती येतो. तर तत्काळ प्रक्रियेत पासपोर्ट अर्जदारच्या हाती येण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो. अगदी वेळेप्रसंगी तत्काळ प्रक्रियेअंतर्गत दोन तासांतही आम्ही पासपोर्ट प्रदान केले आहेत.
प्रक्रिया सोपी करूनही अर्ज करताना अडचणी येतात, यावर काय सांगाल ?
ज्या अर्जदारांना संकेतस्थळावर पासपोर्टसाठी अर्ज करताना अडचणी येतात, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सरकारनेच ‘कॉमन सिटिजन सेंटर्स’ सुरू केली आहेत. विशेष म्हणजे येथे कमी दरात म्हणजे १०० रुपयांत त्यांना यासंबंधीची म्हणजे केवळ अर्ज भरण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे ज्या पासपोर्टसाठी अर्ज करावयाचा आहे, परंतु त्यांना संकेतस्थळावर काही अडचणी येत आहेत. अशांनी ‘कॉमन सिटिजन सेंटर’चा आधार घेतला तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल.
मुंबईबाहेरील अर्जदारांसाठी विशेष व्यवस्था आहे का?
आमच्याकडे ६० जिल्हे आहेत. संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट प्रक्रियेत काही अडचणी येऊ नयेत, म्हणून त्या संबंधित ठिकाणी शिबिरे घेतली जातात. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालये आणि तेथील पोलिसांचे सहकार्य घेतले जाते. सदर शिबिरांचा कालावधी हा दोन दिवसांचा असतो. अशी शिबिरे घेण्यापूर्वी त्याची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही वर्तमानपत्रांतून जाहिराती देतो. शिवाय वृत्तपत्रांतून वृत्त प्रसारित करण्यावर भर देतो. फक्त ही शिबिरे मागणीनुसार घेण्यावर आम्ही भर देतो. आणि शिबिरांच्या माध्यमातून आम्ही आमचे सर्व घबाड संबंधित ठिकाणी नेत अर्जदारांना सुलभरीत्या पासपोर्ट उपलब्ध करून देतो.
वादग्रस्ते प्रकरणे कशी हाताळता ?
आम्ही आणि पोलीस खाते संपूर्णपणे वेगळे आहे. आमच्याकडे जेव्हा वादग्रस्त प्रकरणे दाखल होतात तेव्हा आम्ही सीबीआयची मदत घेतो. काही वेळा त्यांच्याकडूनही आमच्याकडे काही प्रकरणे दाखल होत असतात. अशावेळी आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार काम करतो. संबंधित वादग्रस्त प्रकरणातील माहिती अशावेळी सविस्तर तपासली जाते. शिवाय त्यात तथ्य आढळले तर पासपोर्ट रद्द केला जातो. आणि त्याची माहिती आमच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक विभागाला दिली जाते. दुसरे म्हणजे कधी तरी कौटुंबिक वादात आमची अडचण होते. चूक करण्याची आमची इच्छा नसते. येथे आम्ही नागरिकांना मदत करण्यासाठी बसलो आहोत. जर नागरिकांनी नियम पाळले तर मला नाही वाटत त्यांना काही अडचणी येतील.
बनावट पासपोर्ट प्रकरणे कशी हाताळता ?
बनावट पासपोर्ट प्रकरणे आमच्याकडे आली तर साहजिकच सुरुवात तपासापासून होते. नाशिकला ‘इंडियन सेक्युरिटी प्रेस’ आहे. तिकडे आम्ही आमच्याकडे आलेली प्रकरणे पाठवून देतो. तेथे त्याची पडताळणी केली जाते. पडताळणीनंतर ते त्यांचा अहवाल देतात. अहवालात काही तथ्य आढळले तर मग साहजिकच आम्ही कारवाई करतो. अशा प्रकरणात पासपोर्ट रद्द केला जातो. तरीही आवर्जून नमूद करण्यासारखे हे की, चोर चार पावले पुढे असतात! मात्र आम्हीही सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करीत नाही; कारण मुद्दा प्रतिमेचा आहे. परंतु गेल्या काही वर्षांत बनावट पासपोर्टचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास येते आहे.
लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष सुविधा आहे ?
मालाड आणि अंधेरी येथील पासपोर्ट कार्यालयांत दररोज सकाळी ९ ते १० यावेळेत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मुलाखतीविना पासपोर्टची प्रक्रिया पार पाडली जाते. आणि त्यातही त्यांना काही अडचण आली तर आमचे कार्यालय त्यांना सर्वतोपरी मदत करते.
शब्दांकन : सचिन लुंगसे