पोषक आहार ठेकेदाराच्या मर्जीवरच --स्टिंग आॅपरेशन
By Admin | Updated: July 18, 2014 23:45 IST2014-07-18T23:24:05+5:302014-07-18T23:45:27+5:30
शासकीय वसतीगृहातील वास्तव : शासकीय नियमानुसार आहार क्वचितच; सुरक्षेकडे डोळेझाक; महत्वाच्या अधीक्षक पदांची कमतरता

पोषक आहार ठेकेदाराच्या मर्जीवरच --स्टिंग आॅपरेशन
कोल्हापूर : शासनाचा अध्यादेश धाब्यावर बसवत ठेकेदाराच्या मर्जीवर मिळणारे विद्यार्थ्यांना जेवण... ग्रंथालय नव्हे स्टोअर रूम अशी स्थिती...या ठिकाणी कोंदट वातावरणामुळे घमघमणारा कुबट वास...मोडकळीस आलेले स्वच्छतागृहांचे दरवाजे...असे चित्र आज, गुरुवारी कसबा बावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून न पाहिलेली अंडी, केळी आणि दूध विद्यार्थ्यांनी आजच मिळाली असे सांगीतले. त्यांच्यासाठी तो सुखद धक्काच म्हणावा लागेल. ‘लोकमत’च्या टीमने ‘स्टिंग आॅपरेशन’ केल्यावर हे वास्तव समोर आले.
दुपारी बाराच्या सुमारास ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने वसतिगृहास भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी वसतिगृहाच्या प्रभारी अधीक्षिका या ठिकाणी नव्हत्या. त्यांच्याकडे या वसतिगृहाचा प्रभारी पदभार असल्याने त्या दुसऱ्या म्हणजे मूळ पदभार असलेल्या वसतिगृहात होत्या. काही वेळातच त्या या ठिकाणी आल्या. तोपर्यंत इथला कारभार शिपाईच करताना दिसत होता. कॉलेजला जाण्याची वेळ असल्याने मोजकेच विद्यार्थी या ठिकाणी दिसले. येथील तीन मजली इमारतीच्या खिडक्यांच्या काचा जागोजागी फुटल्या होत्या. काहींचे दरवाजे निम्म्यातून खाली गायब होते. विद्यार्थ्यांना जेथून जेवण दिले जाते ती ‘मेस’ कुलूपबंद होती. मेसच्या जेवणाबाबत विद्यार्थ्यांना विचारल्यावर पूर्वीचे अधीक्षक असल्यापासून शासनाच्या नियमाप्रमाणे जेवण दिले जात नाही. काही जेवण इतके निकृष्ट असायचे की, ते कचऱ्याच्या टोपलीतच टाकले जायचे. आता प्रभारी पदभार घेतलेल्या नवीन अधीक्षिका आल्यापासून जरा बरे जेवण मिळत आहे. शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना नाश्त्यासोबत दूध, फळ व अंडी देणे क्रमप्राप्त आहे; परंतु येथील विद्यार्थ्यांना यातील एकही गोष्ट मिळाली नव्हती.
जेवण उघड्यावरच--खिडक्यांना दारेच नाहीत---पुरेसे विद्यार्थीच नाहीत...
कसबा बावडा (ता. करवीर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत आठवड्यात गृहपाल इनामदार हे सूडबुद्धीने, हुकूमशाही व दडपशाहीचे वर्तन करतात. तसेच सुविधा मागितल्यास धमकी देतात, अशा तक्रारींचे गाऱ्हाणे मांडत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यानंतर इनामदार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. या पार्श्वभुमीवर ‘लोकमत’ ने गुरुवारी जिल्ह्यातील शासकीय मागासवर्गीय वसतीगृहांचे स्टिंग आॅपरेशन केले. यामध्ये शासन कोट्यवधी रुपये अनुदान या वसतीगृहांना देत आहे मात्र कांही वसतीगृहात योग्य नियोजनाअभावी त्याचा फज्जा उडून मुळ हेतूलाच हारताळ लावला जात असल्याचे वास्तव समोर आले.
कार्यालयीन स्टाफ
-अधीक्षक -१
-कनिष्ठ लिपिक- १ (सध्या रिक्त)
-शिपाई-१
-सफाई कामगार-१
-पहारेकरी-१
-कार्यालतील
-कंत्राटी स्टाफ
-युनिट मॅनेजर-१
-सुपरवायझर -१
-सफाई कामगार-४
-मेस ठेकेदार-१
-स्वयंपाकी-३
-मदतनीस-१
-वाढपी-१
दसरा चौकातील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणांची खोली प्रवेशद्वाराजवळच आहे. या ठिकाणी असलेल्या जेवणखोलीला मोठ्या खिडक्या आहेत, पण त्यांना दारे नाहीत, अशी परिस्थिती आहे. यामुळे ऊन, पाऊस आणि वाऱ्यांचा मारा खातच विद्यार्थ्यांना जेवण-नाष्टा करावा लागत आहे.
-दोन वर्षांपूर्वीच गडहिंग्लज शहरातील भाडोत्री इमारतीमधून शेंद्री माळावरील स्वत:च्या सुसज्ज नवीन इमारतीत येथील मुलींच्या वसतिगृहाचे स्थलांतर झाले आहे.
-सर्वसोयी उपलब्ध असल्या तरी अद्याप सोलर सिस्टीम न बसविल्यामुळे मुलींना थंड पाण्याचीच अंघोळ करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा अॅक्वागार्डही नादुरुस्त झाला आहे.
-आश्चर्याची बाब म्हणजे पहारेकरी, शिपाई व कनिष्ठ लिपिक पदापासून अधीक्षकपदाची जबाबदारी दोन वर्षांपासून अधीक्षका तोरगळे याच सांभाळत आहेत.
-मुलींच्या वसतिगृहालगतच मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी पाण्याची देखील सोय नाही. याठिकाणीही मुलांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही.
-काही खिडक्यांच्या काचा फुटल्यामुळे वारा, पाऊस व थंडीपासून संरक्षणासाठी मुलांनी खिडक्यांना ब्लँकेट व चादरी बांधल्या आहेत. मदतनिसाचे येथील एक पद रिक्त आहे.
-अधीक्षकपद देखील रिक्त असल्यामुळे आजरा वसतिगृहाचे
अधीक्षक सुभाष इंगळे यांच्याकडेच येथील अतिरिक्त कार्यभार
आहे.