भीती मोडलीच..ना सॅनिटायझेशन, ना दारावर स्टीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST2021-04-13T04:23:51+5:302021-04-13T04:23:51+5:30
कोल्हापूर गेल्या वर्षी एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर तातडीने ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेची यंत्रणा त्या भागात ...

भीती मोडलीच..ना सॅनिटायझेशन, ना दारावर स्टीकर
कोल्हापूर गेल्या वर्षी एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर तातडीने ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेची यंत्रणा त्या भागात दाखल होत होती. सॅनिटायझेशन केले जात होते. काठ्या लावून तो परिसर बंदिस्त केला जात होता. संबंधिताच्या घरावर स्टीकर लावले जात होते. पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार केली जात होती. पीपीई किटमधून आलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी ही माहिती गोळा करून तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला सुरुवात होत होती; परंतु आता यातील फारसे काही होतच नाही. प्रशासन आणि आरोग्य विभाग शिथिल झाल्यामुळे नागरिकही बेताल झाल्याचे चित्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे. पुन्हा पूर्वीसारखी कडक अंमलबजावणी केली नाही आणि घरात रुग्ण ठेवण्यावर बंधने आणली नाही तर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही स्थिती नियंत्रणात आहे; परंतु त्याआड जे काही चाललं आहे त्यामध्ये सुधारणा झाली नाही तर मात्र मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात कशा पद्धतीने सध्या ‘आवो जावो घर तुम्हारा’ चालले आहे, याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे....
१. हे आहेत प्रशासनातील एका महत्त्वाच्या खात्यातील अधिकारी. त्यांनी बुधवारी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब चाचणी केली. गुरुवारी त्यांचा स्वॅब पाॅझिटिव्ह आला. त्यांनी याबाबत अपार्टमेंटमधील कुणालाही कल्पना दिली नाही. ते खासगी रुग्णालयात दाखल झाले. घरातून त्यांना डबा जातो. त्यांच्या घरात धुण्या, भांड्यासाठी येणारी कामवाली बाई इतर घरातही जाते. इकडे ना महापालिकेचे कुणी आले, ना कुणी दारावर स्टीकर लावले.
२. या महिला आहेत निमशासकीय कर्मचारी. पन्हाळा तालुक्यातील खेडेगावात त्या राहतात. रविवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘अहवाल पॉझिटिव्ह येवू दे; परंतु तुम्ही या चाचण्या करून या.’’ त्या पॉझिटिव्ह आलेल्या महिला कर्मचारी चाचण्या करण्यासाठी खेडेगावातून कोल्हापुरात लॅबमध्ये येवून बसल्या.
३. नृसिंहवाडीत एकाच घरातील ११ जण पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच सांगितले. पहिल्या आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णानंतर तेथील यंत्रणा सक्रिय झाली नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
चौकट
भीती दाखवू नका, पण
गेल्यावर्षीसारखा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर सायरन वाजवत रुग्णवाहिका येत होत्या. त्याला घेऊन जात होत्या. यातील आता काहीच होत नाही. एवढी भीती दाखवायची गरज नाही; परंतु एखाद्या घरातील, अपार्टमेंटमधील नागरिक पॉझिटिव्ह आला असेल तर ते किमान कळत होते. नागरिक काळजी घेत होते. आता यातील काहीच होत नाही. भीती दाखवू नका; पण कुठे कोण पॉझिटिव्ह आले ते कळले तर किमान इतर लोक दक्षता घेतील.
चौकट
पुण्याची पुनरावृत्ती कोल्हापुरात नको
पुण्यात लक्षणे नसलेला रुग्ण घरातच ठेवण्यास परवानगी दिली गेली आणि शिस्त कोणीच पाळली नाही. परिणामी, आख्खेच्या आख्खे अपार्टमेंट पॉझिटिव्ह आल्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर शहरामध्ये इतके आणि उर्वरित बारा तालुक्यात इतके पॉझिटिव्ह नागरिक घरामध्ये वास्तव्यास आहेत. घरी वास्तव्यास असताना सगळीकडेच आवश्यक काळजी घेतलीच जाते असे नाही. त्यामुळे या पर्यायाबाबत फेरविचार करण्याची गरज आहे.