शिक्षा झालेल्या कैद्यांना कारागृहात ‘नो एन्ट्री’
By Admin | Updated: December 16, 2014 23:36 IST2014-12-16T22:14:46+5:302014-12-16T23:36:10+5:30
सुत्रांची माहिती : जीर्ण इमारतीमुळे महत्त्वाच्या प्रकरणातील आरोपी अन्यत्र...

शिक्षा झालेल्या कैद्यांना कारागृहात ‘नो एन्ट्री’
रत्नागिरी : रत्नागिरी येथील विशेष जिल्हा कारागृहात शिक्षा झालेले अन्य ठिकाणचे कैदी ठेवणे गेल्या १५ वर्षांपूर्वीच बंद केले आहे. त्यानंतर केवळ न्यायाधीन (कच्चे) कैदीच या कारागृहात ठेवले जात आहेत. सध्या या कारागृहात ११७ न्यायाधीन कैदी असून, त्यात ८ महिलांचा समावेश आहे. पोटगी प्रकरणात सुमारे महिनाभराची शिक्षा असलेले १० कैदीही येथे असल्याची माहिती कारागृहाच्या सुत्रांनी दिली.
पंधरा वर्षांपूर्वी या कारागृहात जिल्ह्याबाहेरील अनेक महत्त्वाच्या प्रकरणातील शिक्षा झालेले कैदी ठेवण्यात येत असत. मात्र, कारागृहाची ही इमारत ब्रिटिशकालीन व जीर्ण आहे. या विशेष कारागृहाला जुना इतिहास आहे. इमारत जीर्ण झाल्यामुळे याठिकाणी महत्त्वाच्या प्रकरणातील किंवा शिक्षा झालेले कैदी ठेवले जात नाहीत. केवळ न्यायाधीन कैदीच येथे ठेवले जातात. ज्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे, आरोपपत्र दाखल आहे, अशाच प्रकरणातील कैदी सुमारे तीन महिन्यांपर्यंत या कारागृहात ठेवण्यात येतात, अशी माहिती कारागृहाच्या सुत्रांनी दिली.
रत्नागिरी विशेष कारागृह व परिसर अशी तब्बल १६ एकरची जागा असून, या जागेत विशेष कारागृहाची अद्ययावत इमारत उभारणे शक्य आहे. त्याबाबतचा प्रस्तावही अनेक वर्षे शासन दरबारी धूळ खात आहे. त्याबाबत येथील लोकप्रतिनिधीही फारसे उत्साही नसल्याने त्या प्रस्तावावरील धूळ अद्याप झटकली गेलेली नाही. त्यामुळे कारागृहाची अद्यावत इमारत अद्यापही झालेली नाही.
या कारागृहाच्या प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तर जिल्ह्यातील हे ऐतिहासिक विशेष कारागृह अन्यत्रही जाण्याची भीती आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
कारागृह वास्तू जतन करावी
खरेतर काही ‘वास्तू’ या जतन करून ठेवण्याजोग्या असतात. रत्नागिरीतील विशेष कारागृहाची इमारत ही जुन्या वास्तूंमधीलच आहे. त्यात स्वा. वि. दा. सावरकर यांना तेथे बंदी बनवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे ती जपण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. याच कारागृहाच्या सहा एकर जागेत दुसऱ्या ठिकाणी अद्ययावत कारागृह उभारणे शासनाला शक्य आहे.