कपिलतीर्थमधील सात विक्रेत्यांना मनपाची नोटीस
By Admin | Updated: September 16, 2015 00:58 IST2015-09-16T00:58:11+5:302015-09-16T00:58:11+5:30
कारवाईचा इशारा : अतिक्रमण तातडीने काढून घ्या

कपिलतीर्थमधील सात विक्रेत्यांना मनपाची नोटीस
कोल्हापूर : कपिलतीर्थ मार्केटमधील ज्या सात व्यापाऱ्यांनी नियमापेक्षा जादा बांधकाम केले आहे, ते त्यांनी चोवीस तासांत काढून घ्यावे, अन्यथा महापालिका प्रशासन हे अतिक्रमण काढून टाकेल, अशा आशयाची नोटीस मंगळवारी संबंधित व्यापाऱ्यांना इस्टेट विभागातर्फे देण्यात आली. मनपा प्रशासनाने दिलेली मुदत आज, बुधवारी संपणार असल्याने ही कारवाई अटळ आहे.
कपिलतीर्थ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी या अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी याच विषयावरून मोठे वादंग झाले होते. अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी आदिल फरास, राजेश लाटकर यांनी केली होती. त्यामुळे ही कारवाई तातडीने करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.
मंगळवारी सकाळी इस्टेट विभागाचे अधिकारी, कर्मचारी मार्केटमध्ये गेले. त्यांनी संबंधित धान्य विक्रेत्यांना नोटीस लागू केली.