रेंदाळात नवविवाहितेचा खून
By Admin | Updated: September 6, 2015 00:38 IST2015-09-06T00:38:05+5:302015-09-06T00:38:05+5:30
पतीसह तिघांना अटक : घरबांधणीसाठी एक लाख रुपये आणण्यास नकार दिल्याने कृत्य

रेंदाळात नवविवाहितेचा खून
हुपरी : घरबांधणीसाठी माहेरहून १ लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. रूपाली जितेंद्र गवळी (वय २०, रा. रेंदाळ) असे तिचे नाव आहे.
याप्रकरणी हुपरी पोलिसांनी पती जितेंद्र पिराजी गवळी, सासरा पिराजी दत्तू गवळी, सासू किसाबाई गवळी, दीर राहुल गवळी (रा. रेंदाळ) यांना अटक केली आहे.
आसुर्ले येथील रूपालीचा एक वर्षापूर्वी रेंदाळ येथे विवाह झाला होता. लग्नानंतर घरबांधणीसाठी माहेरहून १ लाख रुपये आणण्यासाठी पती जितेंद्र गवळी, सासू किसाबाई, सासरा पिराजी, दीर राहुल यांनी तिच्या मागे तगादा लावला होता. त्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळही करण्यात येत होता. यातूनच रूपालीचा सासरच्या मंडळींनी गळा दाबून खून केला, अशी फिर्याद मृत रूपालीची आई आनंदी विश्वास पांडव (५०, रा. आसुर्ले, ता. राधानगरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी जितेंद्र गवळी, पिराजी, किसाबाई, राहुल यांच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी काल दुपारी हुपरी पोलिसांत रूपालीचा आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली होती. आक्रमक झालेल्या माहेरच्या लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गोंधळ घालून पोलिसांत घातपाताचा संशय व्यक्त केला होता व पतीसह सासरच्या लोकांना मारहाण केली होती.