राज्यात स्वतंत्र पूर आपत्ती व्यवस्थापन विभागाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:45+5:302021-09-26T04:27:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यात स्वतंत्र पूर आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे ...

राज्यात स्वतंत्र पूर आपत्ती व्यवस्थापन विभागाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात स्वतंत्र पूर आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे माजी प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी शनिवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर क्लायमेंट चेंज अँड सस्टेनॅबिलीटी स्टडीज’ यांच्यातर्फे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ‘धरणे, महापूर आणि हवामान बदल’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील होते.
डॉ. वडनेरे म्हणाले, पूर हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. तो थांबविता येणार नसला तरी त्याची तीव्रता कमी करणे निश्चितपणे शक्य आहे. पुराच्या अनुषंगाने स्वतंत्र खाते निर्माण करून केवळ पूरकाळातच नव्हे तर संपूर्ण वर्षभर त्याचे नियोजन करण्यासाठी उच्चपदस्थांमध्ये समन्वय आवश्यक आहे. जलशास्त्राचा नव्याने अभ्यास करावा लागेल. मदत-पुनर्वसनासाठी भरीव आर्थिक मदत हवी.
वडनेरे म्हणाले, सातत्याने महापूर येणाऱ्या कोल्हापूर,सांगलीसारख्या जिल्ह्यात पूररेषेची अंमलबजावणी, प्रसंगी कायदा करून करावी. ही दोन्ही ठिकाणे नद्यांच्या दोन्ही बाजूला वसलेली असल्याने तेथे महापूर आला; मात्र तेवढे एकच कारण त्यामागे नाही. योग्य सांडपाणी, निचरा व्यवस्थापनाचा अभाव हा तर तेथे आहेच; शिवाय भौगोलिक परिस्थिती आणि भराव, धरणे, बंधारे, पूल, बांधकामे आदी मानवी अतिक्रमणे ही कारणेही आहेत.
हवामान, धरण सुरक्षितता आणि साठवण क्षमता या तीन मर्यादा लक्षात घेऊन धरणांवरील जल व्यवस्थापनाचा विचार करावा लागतो. मोठा पाऊस झाला की धरणांतून पाणी सोडावेच लागते. पूरनियंत्रण हे कुशल धरण अभियंत्याचे कर्तव्य असते; मात्र या अनुषंगाने अभियंत्यांसमोर द्विधावस्था असते. पाणी साठवण ही सुद्धा त्याची जबाबदारी असते. पाणी साठवण आणि पूरनियंत्रण या प्रत्यक्षात परस्परविरोधी बाबी आहेत. त्यांचे सुयोग्य परिचालन हे कौशल्याचे काम असल्याचे वडनेरे यांनी स्पष्ट केले.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, सद्यस्थितीत बदलते हवामान आणि मानवी अतिक्रमणे ही कारणे महापुराला कारणीभूत आहेत. केवळ धरणांना त्यासाठी जबाबदार धरणे चुकीचे आहे. केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
धरणाचे आयुष्य १०० वर्षे
धरणाचे आयुष्य हे त्याच्या संरचनात्मक स्थैर्यावर अवलंबून असते. चांगल्या धरणाचे आयुष्य हे साधारण शंभर वर्षे असते, असे अभियांत्रिकी शाखा सांगते. धरणांची चांगल्या पद्धतीने देखभाल व सक्षमीकरण करीत राहणे आवश्यक आहे, असे मतही वडनेरे यांनी व्यक्त केले.
फोटो : २५०९२०२१-कोल-नंदकुमार वडनेरे
शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत शनिवारी जलसंपदा विभागाचे माजी प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी मांडणी केली.