मराठीत सर्वसमावेशक साहित्य संमेलनाची गरज
By Admin | Updated: May 23, 2016 00:57 IST2016-05-23T00:53:43+5:302016-05-23T00:57:40+5:30
हसन कमाल : मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचा समारोप--मुस्लिम समाजातील सकारात्मक गोष्टींचे चित्रण व्हायला हवे

मराठीत सर्वसमावेशक साहित्य संमेलनाची गरज
कोल्हापूर : मराठी भाषेत मुस्लिम मराठी, दलित, अखिल भारतीय मराठी अशी साहित्य संमेलने भरविण्यापेक्षा सर्वसमावेशक साहित्य संमेलन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गीतकार हसन कमाल यांनी केले.
मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष शफाअत खान, आमदार हसन मुश्रीफ, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम, निमंत्रक गणी आजरेकर, आदी उपस्थित होते.
गीतकार कमाल म्हणाले, उर्दू भाषा ही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वापरली जाते. या भाषेत सर्व धर्मांतील साहित्यिकांनी लेखन केले आहे. या भाषेच्या वापरामुळे मराठीला कधीही धोका वाटला नाही. राज्यातील चार हजार ७६३ प्राथमिक शाळांमध्ये उर्दू भाषा शिकविली जाते. यामुळे कधीही मराठी-उर्दू असा संघर्ष झाला नाही. तरीही एकच मातृभाषा असलेल्या मराठीत वेगवेगळ्या नावाने साहित्य संमेलने भरवली जातात, ही खेदाची बाब आहे.
अध्यक्षीय भाषणात खान म्हणाले, उसन्या अनुभवावर काल्पनिक चित्र उभं करून साहित्यनिर्मितीचे दिवस संपले आहेत. मनातील खदखद त्या समाजातील लोक व्यक्त करीत आहेत, ती स्वीकारली जात आहे. सध्याच्या भ्रमसंस्कृती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांना आता अधिकृततेची गरज वाटत आहे. त्यामुळे आत्मचरित्रांची मागणी वाढली आहे. नाकारल्या गेलेल्या प्रत्येकाचं साहित्य हे अधिकृत आहे. भयगंड, फोबिया कमी होत जाऊन जे प्रश्न आजपर्यंत टाळले गेले, त्यांवर आता निर्र्भयपणे बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होत आहे. हे संमेलनाचे फलितच म्हणायला हवे. यापुढे साहित्याने समाजातील प्रश्न नव्या दमाने मांडत पुढे जायला हवे.
आमदार मुश्रीफ म्हणाले, मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साहित्य संमेलनासारख्या उपक्रमांची गरज आहे. यानिमित्ताने नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळाले आहे.
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे कदम म्हणाले, काश्मीरसह अन्य संघर्षपूर्ण राज्यात अशी साहित्य संमेलने पोहोचायली हवीत. ताज मुलानी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
संमेलनातील ठराव
सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी.
महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचा निषेध.
मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्रासाठी एक कोटी रुपये अनुदान द्यावे.
मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी.
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात मुस्लिम साहित्यिकांचा समावेश करावा.
उर्दू-मराठी शाळांना संगणक खरेदीसाठी शासनाने अनुदान द्यावे.
नवोदित लेखकांसाठी राज्य साहित्य संस्कृती मंडळाने जिल्हास्तरावर कार्यशाळा आयोजित कराव्यात.
प्रसारमाध्यमातील मुस्लिम समाजाचे विकृत चित्रीकरण थांबवावे.
‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांचे भडक वृत्तांकन टाळले जावे.
प्रत्येक विद्यापीठात मुस्लिम मराठी साहित्य अध्ययन केंद्र सुरू करावे.
मुस्लिम समाजातील सकारात्मक गोष्टींचे चित्रण व्हायला हवे
परिसंवादातील सूर : प्रतिनिधित्व निर्माण होणे गरजेचे
कोल्हापूर : दहशतवाद, तलाक, बहुपत्नित्व यासारख्या गोष्टींवर चर्चा करीत बसण्यापेक्षा मुस्लिम समाजातील सकारात्मक गोष्टीही माध्यमांनी समोर आणायला हव्यात, असा सूर रविवारी साहित्य संमेलनातील परिसंवादात उमटला.
मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने केशवराव भोसले नाट्यगृहात ‘मुस्लिम समाज आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे होते.
खालिद मुल्ला म्हणाले, प्रसारमाध्यमांतून मुस्लिम समाजाच्या दबलेल्या आवाजाला व्यासपीठ देण्यास विलंब झाला, हे वास्तव आहे. जागतिकीकरणाच्या काळात जग हे एक खेडे बनले आहे; परंतु तरीही भाषिक, प्रादेशिक, जातीय, क्षेत्रीय ‘आयडेंटिटी’ प्रबळ होत आहेत. माध्यमांत मुस्लिम तरुणांनी पुढे यायला हवे. त्यांना संधीची गरज आहे.
ज्येष्ठ पत्रकार पाटील म्हणाले, घटनांचे नेमके विश्लेषण करताना जातिधर्मापेक्षाही समाज म्हणून मुस्लिम हा विषय लेखणीत येतो. यामध्ये बदल करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेतला पाहिजे. जावेद आनंद म्हणाले, समाजातील वास्तव चित्रण म्हणून जे सादर केले जात आहे, ते फारच बाळबोध आहे. माध्यमांना या समाजाबद्दल फारशी माहिती नसल्याने अशा अनेक घटनांना नाहक प्रसिद्धी दिली जाते. या समाजातील सकारात्मक गोष्टी समाजासमोर यायला हव्यात.
ज्येष्ठ पत्रकार अफगाण म्हणाले, मुस्लिम समाजातील माणसांच्या संघर्षाचे प्रतिबिंब माध्यमांतून उमटायला हवे. माध्यमे सर्वच घटकांना समान स्थान देण्याचा प्रयत्न करीत असतात. स्त्रियांचे अधिकार, तलाक यासारख्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. प्रा. डोळे म्हणाले, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने माध्यमांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे या समाजाबद्दल असणारे वेगळं अस्तित्व संपून जातील.
अध्यक्षीय भाषणात चोरमारे म्हणाले, तृप्ती देसार्इंच्या गाभारा प्रवेश आंदोलनावेळी आपलं पुरोगामित्व सिद्ध करायची संधी मुस्लिम समाजाने गमावली. मूळ प्रश्नांना बगल देत किशोरवयीन भाबडेपणा उचलून धरला जात आहे; त्यामुळे नवे प्रश्न निर्माण होत आहेत.