राष्ट्रवादीतील ‘तंटा’ मुंबईत
By Admin | Updated: February 27, 2015 00:22 IST2015-02-26T20:43:34+5:302015-02-27T00:22:30+5:30
सोमवारी बैठक : सुनील तटकरे यांच्याकडून दोन्ही गटांना बोलावणे

राष्ट्रवादीतील ‘तंटा’ मुंबईत
इचलकरंजी : नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांच्यावरील निलंबनाची कारवाई स्थगित करून जांभळे-माने व कारंडे गटाची संयुक्त बैठक मुंबई येथे सोमवारी (२ मार्च) बोलविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये इचलकरंजीतील राष्ट्रवादीतील गटबाजीच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.इचलकरंजी नगरपालिकेत राष्ट्रीय व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सत्तेवर आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षप्रतोदपदी रवींद्र माने व स्वीकृत सदस्यपदी माजी आमदार अशोकराव जांभळे यांची निवड झाल्यामुळे नगरपालिकेमध्ये त्यांचे वर्चस्व राहिले. मात्र, सन २०१४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष विठ्ठल चोपडे हे शहर विकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्यानंतर चोपडे आणि जांभळे-माने यांच्यात खटके उडू लागले. मात्र, नगरपालिकेतील विरोधी शहर विकास आघाडीचे बलाबल अल्प असल्यामुळे चोपडे यांच्या विरोधाकडे जांभळे-माने यांनी दुर्लक्ष केले.दोन महिन्यांपूर्वी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले. त्यांच्या या बंडास चोपडे यांनी पाठिंबा जाहीर केला. परिणामी पालिकेच्या कामकाजात चोपडे यांचे वर्चस्व निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून जांभळे-माने व चोपडे यांच्यात खटके उडू लागले. अशा पार्श्वभूमीवर पक्षप्रतोद माने यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक बोलावून तीमध्ये चोपडे यांच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली. याला प्रत्युत्तर म्हणून विधानसभा निवडणुकीच्या काळात माने यांनी पक्षाच्या विरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांचे पक्षातून निलंबन करण्याचे आदेश प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिला.
जांभळे व माने यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना घेऊन माजी खासदार निवेदिता माने यांच्याकडे दाद मागितली. निवेदिता माने यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तेव्हा त्यांना मुंबईस येण्याविषयी सांगण्यात आले. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये निवेदिता माने, अशोक जांभळे, रवींद्र माने, महेश ठोके, भाऊसाहेब आवळे, नितीन जांभळे, बंडोपंत मुसळे, राजू चव्हाण, रवी कांबळे यांनी तटकरे यांची भेट घेतली. तेव्हा माने यांच्या निलंबनास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र त्यांना दिले.
इचलकरंजीत राष्ट्रवादीत असलेल्या गटबाजीच्या वादासंदर्भात समन्वय साधण्याची प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची इच्छा असून, त्यासाठी सोमवारी मुंबईत पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, मदन कारंडे, विठ्ठल चोपडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना बोलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
गटबाजीमधील समन्वयाची उत्सुकता
इचलकरंजीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये पक्ष स्थापनेपासूनच गटबाजी आहे. काही गटांनी आपापल्या संस्था स्थापन केल्या आणि त्या चालविल्याही. त्यातून प्रत्येक गटाचे स्वतंत्र ‘राज्य’ तयार झाले. पुढे काही वेळा स्थानिक राजकारणात स्वत:च्या सोयीचे निर्णय घेऊन राजकारण साधले. त्यावेळी पक्ष संघटनेची किंवा पदाधिकाऱ्यांची वचक राहिली नाही. त्यामुळे इचलकरंजीत राष्ट्रवादीत असलेले पाच-सहा गट स्वयंपूर्ण व प्रबळ आहेत. आता प्रदेश राष्ट्रवादीकडून अशा गटांमध्ये कसा समन्वय साधला जाणार, याचीच उत्सुकता राष्ट्रवादीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.