‘राष्ट्रवादी’च्या राड्याची दखल

By Admin | Updated: September 5, 2015 00:26 IST2015-09-05T00:24:45+5:302015-09-05T00:26:11+5:30

प्रशासनाकडून कारवाईसाठी चर्चा : घडा भरल्यावर जनताच दखल घेईल : पालकमंत्री

'NCP's intervention' | ‘राष्ट्रवादी’च्या राड्याची दखल

‘राष्ट्रवादी’च्या राड्याची दखल

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ३) रात्री शासकीय विश्रामगृहावर केलेल्या राड्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करता येईल, यावर चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे अधिकारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, शंभर अपराधांचा घडा भरल्यावर जनताच त्यांची दखल घेईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आमदार अमल महाडिक यांनी राज्य सरकारकडून शहरातील विकासकामांसाठी आणलेल्या २० कोटींचे नियोजन सुरू असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक, कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना बैठकीतून पळ काढावा लागला होता. या घटनेची महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शुक्रवारी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन गुरुवारच्या राड्याची माहिती दिली. या अनुषंगाने पुढील कारवाई आपल्या पातळीवर व्हावी, अशी विनंतीही त्यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने या राड्याबाबत तक्रार केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी व आयुक्त यांनाही कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्न पडला. तरीही या प्रकरणी काय करता येईल, या अनुषंगाने माहिती घेतली जात आहे. आपल्याकडे कोणीही तक्रार केली नाही. जर तक्रार आली तर पुढे काय करायचे ते पाहू, असे आयुक्त शिवशंकर यांनी सांगितले.


विरोधकांचा घडा भरला आहे : चंद्रकांतदादा
या प्रकाराचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुरुवारच्या घटनेस जबाबदार असलेले नगरसेवक, कार्यकर्त्यांविरुद्ध कोणी कारवाई करण्यापेक्षा आता जनताच त्याची दखल घेईल, असे पालकमंत्री म्हणाले. शंभर अपराधांचा घडा भरला की, जनता बरोबर त्याची दखल घेऊन त्यांना शिक्षा करते. ही वेळ आता जवळ आलेली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘ सरकारी अधिकारी तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. जेथे त्यांना पोलीस संरक्षण पाहिजे असेल, तेथे ते देण्याची आमची तयारी आहे. विरोधकांची दादागिरी वाढत चालली आहे. कामात हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळे जर अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षण मागितले तर ते दिले जाईल.

पराभूत मानसिकतेतून राष्ट्रवादीचा कोल्हापूरच्या विकासात खोडा : भाजप
कोल्हापूर : पराभूत मानसिकतेतूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी मंत्र्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कोल्हापूरच्या विकासात खोडा घातला जात आहे, अशी टीका शुक्रवारी भाजपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून फायली भिरकाविण्याच्या प्रकाराचा भाजपने तीव्र निषेध केला असून, असा भ्याड प्रकार येथून पुढे खपवून घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पत्रकात म्हटले आहे, की कोल्हापूरच्या विकासकामांसाठी आलेल्या निधीचे नियोजन करणाऱ्या महापालिका पदाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून बैठकीत फायलींची फेकाफेकी व अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी मंत्र्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष निधी म्हणून कोल्हापूरसाठी मंजूर केलेल्या २० कोटी रुपये निधीचे शहराच्या विकासासाठी नियोजन करण्याची बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली. यावेळी माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, नगरसेवक आदिल फरास या प्रमुख नेत्यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. गेली १५ वर्षे यांच्याकडे सत्ता असताना संबंधितांनी शहराच्या विकासाकडे असा निधी आणलेला नव्हता. कारण मलिदा खाणे व ढपला पाडणे हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी कॉँग्रेसची संस्कृती आहे.

‘स्थायी’तसुद्धा पडसाद
कोल्हापूर : राज्य सरकारकडून मिळालेल्या २० कोटींच्या निधीतून करावयाच्या विकासकामांचे परस्पर नियोजन केल्याचा राग राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मनातून अद्याप गेलेला नाही. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत याच मुद्यावरून नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह प्रशासनाला पुन्हा धारेवर धरले. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बरोबरीने कॉँग्रेसचे नगरसेवकही आघाडीवर राहिले. कोणी सांगतंय म्हणून कामे करणार असाल, तर ते खपवून घेणार नाही, अशा शब्दात अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
शुक्रवारी दुपारी सभापती सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू होताच सभापतींसह आदिल फरास व शारंगधर देशमुख यांनी प्रशासनावर हल्लाबोल चढविला. महालक्ष्मी मंदिर परिसरातील एलईडी बल्ब बसविणे आणि रंकाळा तलावाच्या सांडव्याकडील बाजूचा रस्ता करण्यावरून आदिल फरास व शारंगधर देशमुख यांनी अधिकाऱ्यांना घेरले. ही कामे मंजूर होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला तरी कामे का सुरू झाली नाहीत, याचा जाब या दोघांनी विचारला आणि त्यावरूनच वादाला तोंड फुटले.
गुरुवारी रात्री कोणाच्या सांगण्यावरून महापालिकेचे अधिकारी शासकीय विश्रामगृहावर बैठकीला गेले होते? २० कोटींच्या कामांना एका दिवसात कशी एनओसी दिली? स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर कामांची यादी कशी तयार केली? अशा प्रश्नांच्या सरबत्तीने प्रशासनाला भंडावून सोडले. एकीकडे फरास, तर दुसरीकडे देशमुख यांनी सरनोबत यांना झोडण्यास सुरू केले. यामुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले.

नगरसेवकांची हरकत असल्यास कामे वगळणार
यावेळी सरनोबत यांनी खुलास करीत प्रशासनाची बाजू मांडली. २० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे होणार आहेत. विभागीय आयुक्तांनी सुचविलेली कामे करणे खरोखरच गरजेची आहेत का, याची आम्ही पडताळणी करत आहोत. या कामांना एनओसी देताना काही अटींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. जागेवर पूर्वी काम झाले असेल आणि नगरसेवकांची हरकत असेल, तर ते वगळण्यात येईल, असे सरनोबत यांनी स्पष्ट केल्यानंतर वादावर पडदा पडला.

Web Title: 'NCP's intervention'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.