निवतीनजीक समुद्रात बोट बुडाली
By Admin | Updated: August 29, 2015 00:24 IST2015-08-29T00:24:34+5:302015-08-29T00:24:34+5:30
१९ खलाशांना वाचविण्यात यश : लाटांचा तडाखा; बोट बुडून पाच लाखांचे नुकसान

निवतीनजीक समुद्रात बोट बुडाली
म्हापण : निवती बंदरापासून १४ सागरी मैल अंतरावर असलेल्या निवती दीपगृहाजवळच्या खोल समुद्रात ‘लक्ष्मी-४’ ही फायबर बोट समुद्र्रातील प्रचंड लाटेच्या तडाख्याने बुडाली. पाण्यात फेकल्या गेलेल्या १९ खलाशांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा करताच जवळपास असणाऱ्या मच्छिमारांनी या सर्व खलाशांना वाचवले. मात्र, बोटीचे एक इंजिन व जाळे खोल समुद्रात बुडून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. निवती बंदर येथील अरुण सारंग यांच्या मालकीची ही बोट होती.
‘लक्ष्मी-४’ ही फायबर बोट शुक्रवारी पहाटे पाच वाजता अन्य बोटींबरोबर मासेमारीसाठी निवती दीपगृहाजवळील खोल समुद्रात गेली होती. समुद्रात जाळे टाकण्यापूर्वीच समुद्रात अचानक उठलेल्या एका प्रचंड लाटेच्या तडाख्याबरोबर ही बोट उलटून बुडाली व बोटीवर असलेले खलाशी खोल पाण्यात फेकले गेले. या खलाशांनी जिवाच्या आकांताने केलेला आरडाओरडा ऐकून जवळपास असलेल्या अभय मेतर यांच्या ‘कामिनी’ व गोपाळ भगत यांच्या ‘गौरीनंदन’ या बोटीवरील खलाशांनी तत्काळ घटनास्थळी आपल्या बोटी आणून बुडणाऱ्या खलाशांना सुखरूपपणे आपल्या बोटीवर आणले. किनाऱ्यावर भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती देण्यात आली. किनाऱ्यावरील सुमारे १०० मच्छिमारांनी अन्य बोटीवरून घटनास्थळी धाव घेत खोल पाण्यात बुडालेली फायबरबोट व बोटीवरील १९ खलाशांना किनाऱ्यावर आणले. मात्र, या दुर्घटनेत मच्छिमारी जाळे व इंजिन पाण्यात बुडाल्याने व दुसरे इंजिन नादुरूस्त झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्रानेही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वत्र संदेश पाठवल्याने कोस्टगार्डने विमानाद्वारे घटनास्थळी अधिकारी पाठवून वस्तुस्थितीची पाहणी केली. वेंगुर्ले तहसीलदार जगदीश कातकर, निवती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस हवालदार गिरकर, बांगर व त्यांचे सहकारी, म्हापण मंडल अधिकारी परब, कोचरा तलाठी निगरे आदींनी निवती बंदर येथे येऊन वस्तुस्थितीची माहिती घेतली.
या दुर्घटनेमधून सीताराम गंगाराम सारंग (३१), अविनाश अरुण सारंग (३८), जयराम अरुण सारंग (३५), प्रजोत प्रदीप मेतर (२४), सागर प्रदीप मेतर (२२), काशिनाथ विजय राऊळ (३१), सतेज बाबू धुरी (२९), मंगेश विठ्ठल धुरी (२४), परमेश्वर हरिश्चंद्र पडते (२८), रामचंद्र हरिश्चंद्र पडते (२६), हनुमंत पांडुरंग पडते (३४), राजन सोपान खवणेकर (३८), नरेंद्र वासुदेव रांजणकर (२४, सर्व राहणार निवती मेढा), महाबळेश्वर कुर्ले (४५, रा. गोकर्ण) नरसिंव्हा मोबाला (३०), धनराज बोहरा (३२), देवा बोहरा (३२), स्वामी मोबाला (३२), जेटली बोहरा (३२, सर्व रा. आंध्रप्रदेश) यांना वाचवण्यात आले.
बुडालेली बोट व त्यावरील खलाशांना वाचवण्याच्या मोहिमेत अभय मेतर, गोपाळ भगत, सुरेश पडते, रामचंद्र भगत, नाना सावंत, शाम सारंग, रघुनाथ केळुसकर यांच्या फायबर नौकांवरून सुमारे शंभर लोक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
केवळ दैव बलवत्तर म्हणून...
या दुघटनेत सापडलेल्या खलाशांपैकी प्रजोत प्रदीप मेतर व हनुमंत पांडुरंग पडते घटनेविषयी बोलताना म्हणाले, पहाटे घराजवळून निघाल्यावर निवती रॉकजवळ जाळी पाण्यात टाकण्यापूर्वीच एक प्रचंड लाट आमच्या बोटीवर कोसळली व आम्ही कधी पाण्यात फेकले गेलो हे कळलेच नाही. आता आपण काही वाचत नाही असे वाटून शेवटचा पर्याय म्हणून जिवाच्या आकांताने ओरडलो आणि नजीकच्या बोटींनी आम्हाला वाचविले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो.
आठ वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण
सुमारे आठ वर्षांपूर्वी अरुण सारंग यांची फायबर नौका बुडून झालेल्या अपघातात निवती मेढा येथील प्रभाकर विठ्ठल मेतर या खलाशाचा बुडून मृत्यू झाला होता. ती घटनाही निवती रॉकच्याच परिसरात घडली होती. त्यामुळे या नौकेची दुर्घटना झाल्याचे समजताच किनारपट्टीवर घबराट निर्माण झाली होती.