राष्ट्रवादी ‘कागल-राधानगरी लिमिटेड पक्ष’
By Admin | Updated: August 29, 2015 00:27 IST2015-08-29T00:27:34+5:302015-08-29T00:27:34+5:30
अरुण इंगवले यांचा घरचा आहेर : नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप

राष्ट्रवादी ‘कागल-राधानगरी लिमिटेड पक्ष’
कोल्हापूर : पक्षाची पदे घ्यायची आणि घरी बसण्याची प्रवृत्ती पक्षात वाढली असून, नेत्यांचे जिल्ह्याच्या पूर्व भागात लक्ष नसल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेस हा ‘राधानगरी-कागल-चंदगड लिमिटेड’च पक्ष असल्याची खरमरीत टीका पक्षाचे खजानीस अरुण इंगवले यांनी केली. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप शुक्रवारी पक्षाच्या ताराबाई पार्क कार्यालयात झाले, त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निरीक्षक दिलीप पाटील होते. पक्षांच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवीत इंगवले म्हणाले, गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याने पक्ष कमकुवत होत आहे. राधानगरी, चंदगड, कागल, भुदरगड म्हणजे राष्ट्रवादी नव्हे. नेत्यांनी पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांकडे लक्ष द्या. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, दिल्लीतील सरकारला कळेना आणि राज्य सरकारला समजेना, अशी अवस्था झाल्याने येत्या वर्षभरात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून सरकारचे वाभाडे काढावे. पूर्र्वेकडे लक्ष नाही, असे म्हणू नका. जिल्हा बॅँकेचे दोन संचालक पूर्वेकडचे आहेत. काही ठिकाणी नाराजी आहे, ती दूर केली जाईल. पक्षात राहून चुकीची भूमिका कोणी घेत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. आजपर्यंत ताठ मानेने राजकारण केले, कारवाईही त्याच ताकदीने करू. दिलीप पाटील म्हणाले, सहकार चळवळ ही आपली शक्तिस्थळे आहेत, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असून, कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावत सरकारला सळो की पळो करून सोडावे. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन करीत सरचिटणीस अनिल साळोखे यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत केलेल्या कामाबाबत त्यांनी कौतुक केले. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रकाश पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, शिवानंद माळी, आदींनी मनोगत व्यक्त केले.
फेटा राष्ट्रवादीचा, रसद विरोधकांना!
महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत, पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचे, पक्षाचा सत्कार स्वीकारायचा आणि आपली सगळी रसद विरोधकांना पुरवून त्यांचा प्रचार सुरू आहे. अशा प्रवृत्तीला पायबंद घाला, असे अरुण इंगवले यांनी सांगितले.