नेत्यांच्याच कुस्तीने ‘राष्ट्रवादी’ घायाळ
By Admin | Updated: May 24, 2016 00:59 IST2016-05-24T00:24:23+5:302016-05-24T00:59:34+5:30
मुश्रीफ-महाडिक शीतयुद्ध : जिल्ह्यातील बलाढ्य पक्षाची पडझड; कार्यकर्त्यांऐवजी घरातल्यांनाच संधी - पक्षाचा 'राज' रंग-राष्ट्रवादी

नेत्यांच्याच कुस्तीने ‘राष्ट्रवादी’ घायाळ
एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे इतके प्राबल्य होते की तेवढी ताकद खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यातही त्या पक्षाची नव्हती; परंतु आता तो इतिहास झाला असून आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्या वर्चस्वाच्या कुस्तीत पक्षच घायाळ झाल्याचे चित्र सध्या आहे. ‘राष्ट्रवादी म्हणजेच मुश्रीफ’ अशी स्थिती आहे. त्यामुळे इतर नेत्यांना पक्षात मान नाही व त्यांच्या म्हणण्याला किंमतही नाही. महाडिक पक्षाचे खासदार असूनही त्यांना पक्षसंघटनेशी काही देणे-घेणे नाही. त्यांचा सवता सुभा कायम आहे. मागच्या काही वर्षांतील पक्षाचा परफॉमर्न्स पाहिल्यास वजाबाक्याच जास्त झाल्याचे दिसते.
एकेकाळी दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक, बाबा कुपेकर, दिग्विजय खानविलकर, तसेच श्रीमती निवेदिता माने, नरसिंगराव पाटील, के. पी. पाटील, हसन मुश्रीफ अशी भक्कम नेतृत्वाची फळी या पक्षाकडे होती. दोन खासदार व सहा आमदार आणि ‘गोकुळ’वगळता अन्य बहुतांशी संस्था या पक्षाच्या ताब्यात होत्या. कोल्हापूर हा त्याकाळी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा गड’ मानला जाई. शरद पवार यांच्या राजकारणाला या जिल्ह्याने सर्वाधिक ताकद दिली. एवढे वैभव असलेल्या पक्षाची आता जिल्ह्यात वाताहत झाली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांनुसार पाहिल्यास कोल्हापुरात थोडा तरी पक्ष जिवंत आहे, परंतु हातकणंगलेत तो अस्तित्वहीन झाला आहे. कागल, चंदगड आणि राधानगरी-भुदरगडवगळता अन्य तालुक्यांतील स्थितीही त्याहून वेगळी नाही. तिथे तालुकाध्यक्ष कोण आहेत याचीही लोकांना माहिती नाही, अशी स्थिती आहे. गेल्या लोकसभेत पक्षाने एक जागा लढवून शंभर टक्के यश मिळविले हे खरे असले तरी लढण्यापूर्वीच शंभर टक्के अपयश हातात पडले होते. कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी पक्षाकडे उमेदवारच नव्हता शेवटी पवार यांनीच गेम करून काँग्रेसच्या गळ््यात ही जागा मारली. कोल्हापूरची जागा निवडून आणण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्यावर टाकण्यात आली होती. तगडा उमेदवार दिल्याशिवाय हे शक्य होणार नाही म्हणून मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना पायघड्या घातल्या. राष्ट्रवादी व काँग्रेसची ताकद आणि व्यक्तिगत महाडिक गटाची ताकद अशी मोट बांधून ते मोदी लाटेतही जिंकून आले; परंतु निकालानंतर पक्षात दोन सत्ताकेंद्रे तयार झाली. त्यात महाडिक यांची एकदा निवडून आल्यावर भूमिका बदलली. त्यातून दरी वाढत गेली. विधानसभा असो की महापालिका निवडणूक ते राष्ट्रवादीचे खासदार नव्हे तर महाडिक गटाचे नेते असल्यासारखाच त्यांचा व्यवहार राहिला. स्थानिक राजकारणात कोणती भूमिका घ्यावी, याचे स्वातंत्र पवारसाहेबांनी आपल्याला दिले असल्याचे ते जाहीरपणे सांगतात. महापालिका निवडणुकीतही ते हेच सांगत होते. आता पक्षाकडे कागल व चंदगड हे दोनच आमदार आहेत. बाकीच्या आठ ठिकाणी भक्कमपणे लढू शकेल व विजयापर्यंत जाऊ शकेल असा एकही नेता नाही. कागलमध्येही कामाचा डोंगर उभा करूनही मुश्रीफ यांना विजयासाठी गतनिवडणुकीत झुंजावे लागले. पुढची निवडणूक अजून लांब असली तरी भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आतापासूनच ‘मुश्रीफ आमदार असणार नाहीत,’ अशी घोषणा केली आहे. चंदगडमध्ये आता मुश्रीफ यांनीच नंदिनी बाभुळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राधानगरी-भुदरगडमध्ये ‘के. पी. पाटील विरुद्ध ए. वाय. पाटील’ यांच्यातच उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे. ए. वाय. यांच्या वाढदिवसाला आता राधानगरी-भुदरगडचे एकमुखी नेतृत्व म्हणून डिजीटल लागू लागले आहेत. हे दोन-तीन महत्त्वाचे मतदारसंघ सोडले तर अन्य मतदारसंघांत सगळीच आलबेल आहे. शिरोळमधून राजेंद्र यड्रावकर यांना गेल्या निवडणुकीत दोन नंबरची मते मिळाली होती. ते या वेळेलाही तगडे उमेदवार असतील परंतु ती पक्षापेक्षा त्यांच्या गटाची ताकद आहे. नगरपालिकेतही यड्रावकर गट म्हणूनच ते राजकारण करतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी त्यांना डावलले परंतु ते त्यांना रोखू शकले नाहीत. पक्षात आपल्याला कोण आव्हान देणारे तयार होऊ नये, अशी व्यवस्था प्रत्येक टप्प्यावर केली जात आहे. पक्षाचे भले बुरे जे काही ठरवायचे त्याचे वटमुखत्यारपत्रच मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आल्यासारखी स्थिती आहे. या सगळ््याचा परिणाम म्हणून महापालिकेत पक्षाला मर्यादित यश मिळाले. तोंडावर नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यातील कागलवगळता शंभर टक्के हुकमी यश मिळेल अशी स्थिती इतरत्र कुठे नाही. जिल्हा परिषदेत या पक्षाचे आता १५ सदस्य आहेत. बाजार समितीत सत्ता असली तरी संख्याबळ घटले. जिल्हा बँकेतही मुश्रीफ यांनी अनेक जोडण्या केल्यामुळे त्यांना अध्यक्ष व पक्षाकडे सत्ता राहिली. मुश्रीफ हे कागल तालुक्याचे व्यक्तिगत राजकारण शाबूत ठेवून पक्ष सांभाळतात अशी त्यांच्यावर टीका होते. ‘आक्रमक कार्यकर्त्यांचा पक्ष’ अशी एकेकाळी या पक्षाची प्रतिमा होते; परंतु आता अशा कार्यकर्त्यांची वानवा आहे. महापालिका असो की जिल्हा बँक जेव्हा केव्हा कार्यकर्त्यांना संधी द्यायची वेळ आली तेव्हा नेत्यांनी आपल्याच बायका-पोरांना पुढे केल्याने कार्यकर्त्यांत कमालाची नाराजी आहे. संघटनात्मक एकी, कार्यकर्त्यांचे केडर यामुळेच पक्ष जिवंत राहतो परंतु त्याचीच तर पक्षात सध्या वानवा आहे. सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ््या पडझडीकडे नेतृत्वाचेही लक्ष नाही. - विश्वास पाटील.
(उद्याच्या अंकात भारतीय जनता पक्ष)
दोन सत्ताकेंद्रे !
लोकसभा निकालानंतर पक्षात दोन सत्ताकेंद्रे तयार झाली. त्यात महाडिक यांची एकदा निवडून आल्यावर भूमिका बदलली. त्यातून दरी वाढत गेली. विधानसभा असो की महापालिका ते राष्ट्रवादीचे नव्हे, तर महाडिक गटाचे नेते असल्यासारखाच त्यांचा व्यवहार राहिला.
कारखाना निवडणुकीतही आव्हान
गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीची दमछाक झाली. तिथे ‘स्वाभिमानी’ने विरोधी आघाडीची संगत केली असती तर सत्तांतर झाले असते. आताही आजरा कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जोरदार आव्हान दिले गेले आहे.
यामुळे खासदारांना एका अर्थाने पक्षानेच वाळीत टाकले असल्याचे चित्र आहे. अशी स्थिती असेल तर मग जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिकांच्या निवडणुकांना पक्ष मजबुतीने सामोरा कसा जाणार हे कोडेच आहे.
गेल्या काही वर्षांत
मुश्रीफ-महाडिक यांच्यात वरकरणी कोणताही वाद दिसत नसला तरी अंतर्गत खदखद आहे.