जिल्हाभर उद्यापासून ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:24+5:302021-05-31T04:18:24+5:30
कोल्हापूर : कोरोनाची तिसरी लाट विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याची शक्यता गृहित धरुन ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हे अभियान उद्या ...

जिल्हाभर उद्यापासून ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी’ अभियान
कोल्हापूर : कोरोनाची तिसरी लाट विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याची शक्यता गृहित धरुन ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हे अभियान उद्या (१ जून)पासून जिल्ह्यात सुरु होत आहे, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवार जिल्हाधिकारी कार्यालयात केली. १८ वयोगटाच्या आतील १० लाख विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची जबाबदारी १० हजार शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांबाबत तिसऱ्या लाटेचे नियोजन करताना शिक्षकांना विश्वासात घ्यावे, अशी विनंती शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली होती. त्यानुसार रविवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी वेबिनारद्वारे जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील यांनी बैठकीतील वृत्तांत सांगितला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, काेरोनाची तिसरी लाट ० ते १८ वयोगटासाठी धोक्याची असल्याने जिल्हा प्रशासन आतापासूनच अलर्ट झाले आहे. टास्क फाेर्स स्थापन करण्याबरोबरच उपचार पध्दती कशी असणार, कोविड सेंटर कसे उभे राहणार, याविषयी काटेकोर नियोजन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वयोगटातील मुलांचे शिक्षकांच्या माध्यमातून समुपदेशान करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. या मुलांवर फोकस ठेवतानाच त्यांना योग्यप्रकारे माहिती दिली जाईल, याचीदेखील खबरदारी घेतली जात आहे. आता या मुलांची यादी आहे, पण पुढील आठ दिवसात ती यादी अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चौकट
व्हॉट्सअप बघून उपचार नको
लहान मुलांच्या बाबतीत पालकही संवेदनशील असतात. याचा गैरफायदा घेऊन हे करावे हे करु नये, असे सल्ले व्हाॅट्सअपवरुन सर्रास दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या मुलांच्या बाबतीतील उपचार हे टास्क फोर्स सांगेल तसेच आणि जिल्हाधिकारी सूचना देतील त्याप्रमाणेच होणार आहेत. त्यामुळे उठसूट सल्लावजा संदेश व्हाॅटसअपवर देऊन संभ्रम निर्माण करु नये, माहिती द्यायचीच असेल तर ती टास्क फोर्सकडे द्यावी, त्याची सत्यता तपासून मगच त्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
चौकट
महापूर नियोजनासाठी आज बैठक
धरणातील पाणीसाठ्याच्या नियंत्रणाचा गेल्यावर्षी राबवलेला उपक्रम यावर्षीदेखील त्याचप्रमाणे राबवला जाणार आहे. महापुराच्या बाबतीत कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांची एकत्रित बैठक आज (साेमवारी) मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलावली आहे. तेथे अलमट्टी व कर्नाटक सरकारच्या धोरणाबाबत व पूर नियंत्रण समितीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.