साठे महामंडळ गैरव्यवहारप्रकरणी मुश्रीफ यांनी मागितली माफी
By Admin | Updated: August 11, 2015 22:41 IST2015-08-11T22:41:27+5:302015-08-11T22:41:27+5:30
रमेश कदमांकडून पदाचा गैरवापर

साठे महामंडळ गैरव्यवहारप्रकरणी मुश्रीफ यांनी मागितली माफी
कागल : मातंग समाजाच्या विकासासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने महामंडळ कार्यरत आहे. गोरगरीब आणि उपेक्षितांचे जिणे जगणाऱ्या मातंग समाजाचा आर्थिक विकास व्हावा म्हणून शासनानेही भरीव अर्थिक निधी या महामंडळासाठी दिला. मात्र, आमच्या पक्षाचे आमदार रमेश कदम यांनी या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करीत गैरव्यवहार केले. त्याबद्दल समस्त मातंग समाजाची मी माफी मागतो, असे प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी केले.येथे हसन मुश्रीफ युवा शक्ती संघटनेच्यावतीने आयोजित मांतग समाज मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा संगीता गाडेकर, प्रा. शरद कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, संघटनेचे अध्यक्ष संजय हेगडे, दलित महासंघाचे बळवंतराव माने आदी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, साठे महामंडळातील गैरव्यवहारचे प्रकार वाचून मी थक्क झालो. एवढा मोठा निधी जर मातंग समाजाला प्रामाणिकपणे मिळाला असता, तर कितीतरी कुंटुंबे अर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असती. मातंग समाजाच्या विकासासाठी यापुढेही मी सदैव तत्पर राहणार आहे.
प्रा. शरद कांबळे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी समाज व्यवस्थेबद्दलची कामगिरी, कष्टकऱ्या बद्दलची तळमळ आपल्या साहित्यातून मांडली. विश्वातील अनेक वैचारिक घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या या साहित्यातून दिसते, म्हणून ते विश्वरत्न आहेत.