राजकीय पक्षांना पालिका निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:24+5:302021-02-09T04:26:24+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या वर्षावर येऊन ठेपली आहे. जनतेतून ऐवजी नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने ...

राजकीय पक्षांना पालिका निवडणुकीचे वेध
संदीप बावचे
जयसिंगपूर : नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या वर्षावर येऊन ठेपली आहे. जनतेतून ऐवजी नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीला महत्त्व आले आहे. जयसिंगपुरात आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जात असल्या तरी आगामी निवडणुकांचे राजकारण गृहीत धरून नेतेमंडळी राजकीय पेरणी करतात. राज्यातील सत्ताबदलामुळे नगरपालिकेची येणारी निवडणूक आघाडी की पक्षीय पातळीवर याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे.
गत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू विकास आघाडी; तर शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप व मित्रपक्षांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. बहुमत ‘शाहू’चे, तर नगराध्यक्ष ताराराणी आघाडीचा झाला होता. काही विकासकामांवरून दोन्ही आघाड्यांमध्ये समझोता एक्स्प्रेस धावली होती. मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये पुन्हा बिनसले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. गेल्या वर्षभरापासून दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांमध्ये पुन्हा एकोपा निर्माण होऊन विकासाचे राजकारण सुरू झाले आहे.
विषय समित्यांच्या निवडीत स्वाभिमानीला सत्ताधारी शाहू आघाडीने स्थान दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सहमतीच्या राजकारणाला आतापासून सुरुवात झाली आहे.
.........
यड्रावकरांच्या भूमिकेकडे लक्ष
सन २०१९ च्या निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर आमदार झाले. त्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपदही मिळाल्याने तालुक्यात यड्रावकर गटाची राजकीय ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून यड्रावकर यांची राजकीय रणनीती सुरू असून ते आगामी नगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना कशी करतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.
............
राजकीय मंडळींच्या भूमिकेकडे लक्ष
गत निवडणुकीत डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील शाहू आघाडीत होते; तर माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपचे अनिल यादव, डॉ. अशोकराव माने ही राजकीय मंडळी ताराराणी आघाडीत होती. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे बळ ताराराणी आघाडीला होते. सध्या राजकीय संदर्भ बदलल्यामुळे पालिका निवडणुकीत नेत्यांचे राजकीय आडाखे कसे राहतील, याबाबतही उत्सुकता आहे.