कोरोना रोखण्यात महापालिकेचे अभियान ठरले प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:21+5:302021-06-05T04:18:21+5:30

कोल्हापूर : शहर हद्दीतील कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राबविलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या ...

The municipal campaign was effective in preventing corona | कोरोना रोखण्यात महापालिकेचे अभियान ठरले प्रभावी

कोरोना रोखण्यात महापालिकेचे अभियान ठरले प्रभावी

कोल्हापूर : शहर हद्दीतील कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राबविलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या असून, घर ते घर सर्वेक्षण, तसेच संजीवनी अभियान अंतर्गत केलेल्या तपासणीतून १५२५ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जर पालिका प्रशासनाने हे दोन उपक्रम राबविले नसते तर कोरोना संसर्गाचा आत्तापेक्षाही अधिक उद्रेक झाला असता.

कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना त्याला रोखायचे कसे असा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर होता. त्यामुळे सुरुवातीला घर ते घर जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. महापालिका आरोग्य विभाग, आशा कर्मचारी, शिक्षक सारे झाडून कामाला लागले आणि घराघरांत जाऊन सर्वेक्षण करायला लागले. टेंपरेचर, ऑक्सिजन लेव्हल तपासणी सुरू झाली. त्यातून कोरोनाबाधित असलेले आणि कोणतीही लक्षणे नसल्यामुळे घरात आणि समाजात वावरत असलेले रुग्ण समोर आले, त्यांच्यावर उपचार करणे सुरू झाले.

त्यानंतर महापालिकेच्यावतीने दि.१६ ते ३१ मे अखेर संजीवनी अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. आत्तापर्यंत १९ हजार १५६ व्याधीग्रस्‍त नागरिकांची या अभियानातून तपासणी केली असून, ७२५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर ‘घर टू घर’ सर्व्हेमध्ये आत्तापर्यंत १३ हजार ०३० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये ८०० नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

या दोन्ही सर्वेक्षणात आरटीपीआरचा प्रलंबित अहवाल आला असून, दोन्ही सर्वेक्षणात आत्तापर्यंत १५२५ पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. ‘ब्रेक द चेन’साठी हे अभियान महत्त्वाचे ठरले आहे. यामुळे वेळीच कोरोना रुग्णाचे निदान होत असल्याने त्यांच्यापासून होणारा संसर्ग रोखण्यात यश येत आहे.

सर्वेक्षणात संवेदनशील परिसरातील व्याधीग्रस्त लोकांची तपासणी केली जाते. सहा मिनिटांचे वॉकटेस्ट घेऊन ऑक्सिजन लेवल तपासली जाते. यामध्ये कोरोना संशयित रुग्णांची तत्काळ कोरोना तपासणी केली जाते. निदान त्वरित होत असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका यामुळे कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास हे अभियान प्रभावी ठरले आहे. शहरात ६५ हजार ४९६ व्याधीग्रस्त नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: The municipal campaign was effective in preventing corona