राजाराम लोंढेकोल्हापूर : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकींचा बिगुल वाजल्याने गावपातळीवरील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेली साडेतीन वर्षे निवडणुका कधी होणार याकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांकडून मतदारसंघ व आरक्षणाचे आडाखे बांधले जात असून, आता थांबायचे नाही, असा निर्धार करत अनेकांनी शड्डू ठोकले आहेत.लोकसभा व विधानसभेचा मार्ग हा पंचायत समित्या व जिल्हा परिषदेमधूनच जातो, हा इतिहास आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी बहुतांश जणांचा प्रवास पंचायत समिती व्हाया जिल्हा परिषद असाच झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये चुरस पाहावयास मिळते. मात्र, साडेतीन वर्षांपासून निवडणुका न झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये खच्चीकरण झाल्याची भावना आहे. निवडणूक आयोगाने मतदारसंघ रचना तयार करण्याचा कालावधी निश्चित केल्याने इच्छुकांच्या हालचाली वेगावल्या आहेत.‘करवीर’, ‘कागल’, ‘आजरा’ वगळता इतर ठिकाणी मतदारसंघात फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. तरीही गावांची अदलाबदल झाली, तर कोणती गावे समाविष्ट होऊ शकतात. २०१२ व २०१७ ला तिथे कोणते आरक्षण होते. चक्रीय पद्धतीने आता कोणते आरक्षण असेल, याचे आडाखे इच्छुक बांधू लागले आहेत.
‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये जागा वाढणार?‘करवीर’मध्ये जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समित्यांच्या दोन जागा वाढणार आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येचा विचार केल्यास गांधीनगर, मुडशिंगी, उचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, वडणगे, शिये या गावांची वाढ झपाट्याने झाली आहे. यातील बहुतांश गावे ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये येत असून, येथेच वाढीव मतदारसंघ होण्याची शक्यता आहे.
आजरेकर देणार न्यायालयात आव्हान?आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन मतदारसंघ होते. त्यांतील एक कमी केल्याने ‘आजरा’ची गगनबावडा तालुक्यासारखी अवस्था झाली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेविरोधात न्यायालयात जाण्याच्या हालचाली आजऱ्यात सुरू झाल्या आहेत.
या नेत्यांचा प्रवास झाला व्हाया जिल्हा परिषद..स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासह अनेक दिवंगत नेते आमदार, खासदार झाले. त्याशिवाय विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संजय मंडलिक, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर.