कोरोनापेक्षा जगण्याचीच अधिक चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:42+5:302021-05-24T04:21:42+5:30

भारत चव्हाण / कोल्हापूर : देशभरातील कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाची महामारी, पहिली लाट ओसरते ना ओसरते तोच दुसरी लाट, सतत ...

More about survival than corona | कोरोनापेक्षा जगण्याचीच अधिक चिंता

कोरोनापेक्षा जगण्याचीच अधिक चिंता

भारत चव्हाण / कोल्हापूर : देशभरातील कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाची महामारी, पहिली लाट ओसरते ना ओसरते तोच दुसरी लाट, सतत वाढत असलेला रोगाचा संसर्ग, संचारबंदी, कडकडीत लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्यांचं जगणं हैराण झालं असून, यापुढील काळात जनतेला काेरोनापेक्षा जगण्याचीच अधिक चिंता लागून राहिली आहे.

एकीकडे कोरोनाच्या महामारीतून जगलो तरच आपण काही मिळवू - कमवू शकू, असे सांगितले जात असले तरी उत्पन्नाचे सर्वच मार्ग जेव्हा खुंटतात, तेव्हा जगण्यासाठी पोट कसं भरायचं, या एकाच प्रश्नाने सर्वसामान्यांना सतावून सोडले आहे. कोरोनापेक्षा हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. सर्वसामान्यांच्या या दुखण्यावर समाजानं, प्रशासनानं, शासनानं कितीही फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. मोडकी - तोडकी का असेना मदत केली तरी त्याने सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजा दीर्घकाळ भागणार नाहीत, हे वास्तव आहे.

गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरु झाला आणि नागरिकांच्या जगण्याला ग्रहण लागले. श्रीमंतांच्या महालापासून ते झोपडीपर्यंत सर्वांनाच त्याची झळ कमी-अधिक प्रमाणात बसली आहे. परंतु, ज्यांचे हातावरचे पोट आहे, रोजंदारीवर कुटुंबाचा गाडा चालतो अशांना त्याची झळ अधिक बसली आहे. हातचं राखून ठेवलेलं सगळं संपलं आहे, आता उद्या खायचं काय आणि जगायचं कसं, याच प्रश्नांनी सुकलेल्या मनात घर करुन टाकले आहे.

कोरोनामुळे केवळ उद्योग, व्यवसाय, व्यापारच बुडालेला नाही तर प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही नुकसान होत आहे. त्यांचे खच्चीकरण होताना दिसत आहे. नोकरी-रोजगार बुडाल्याने तरुण हैराण आहे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होत आहे. प्रत्येक घटकावर परिणाम झालेला आहे. यातून कसं उभं राहायचं, पुन्हा पूर्ववत परिस्थिती येण्याकरिता आणखी किती काळ जाईल, याबाबतच्या शंका-कुशंकांची चिंता प्रत्येकाला सतावत आहे.

- दोन-अडीचशे रुपये मिळायचेही बंद -

कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे. दिवसभर राबल्यावर पेट्रोल खर्च वगळता चारशे-पाचशे रुपये मिळत होते. अंशत: लॉकडाऊनच्या काळात सकाळी सात ते अकरा यावेळेत दोन अडीचशे रुपये मिळायचे. त्यातून दूध, भाजीपाला भागत होता. पण कडकडीत लॉकडाऊनच्या काळात तेही मिळणे बंद झाले. ज्यांची स्वत:ची रिक्षा आहे, त्याचे त्यातल्या त्यात बरे, पण जो दुसऱ्याची रिक्षा चालवतो, त्याचे काय हाल झाले असतील, याची कल्पनाही न केलेली बरी.

- विद्यार्थ्यांचं असंही नुकसान -

गेले वर्षभर शाळा, महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. काही शाळा सुरु झाल्या पण दुसऱ्या लाटेच्या भीतीने बंद झाल्या. ऑनलाईन शिक्षणाच्या धोरणामुळे शैक्षणिक नुकसान तर झाले आहेच, शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांचे बौध्दिक नुकसानही झाले आहे. ऑनलाईन शिक्षण देताना, समजून देताना आणि घेताना बरीच दमछाक झाली. त्याचा एकंदर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना बाहेर पडायचे आहे.

Web Title: More about survival than corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.