मोदींच्याप्रमाणे निर्मला सीतारामनकडून महाराष्ट्राचा अपमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:25+5:302021-05-31T04:19:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कागल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याशी संबंधित साहित्य खरेदीवरील जीएसटी माफ करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित ...

मोदींच्याप्रमाणे निर्मला सीतारामनकडून महाराष्ट्राचा अपमान
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याशी संबंधित साहित्य खरेदीवरील जीएसटी माफ करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांचे सर्व अर्थमंत्री सदस्य असणारी एक समिती नेमली. मात्र, त्याचे अध्यक्षपद मेघालयसारख्या छोट्या राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे दिले. वास्तविक ते अजित पवार यांना द्यायला हवे होते. पंतप्रधान मोदींप्रमाणे निर्मला सीतारामनही महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
कागल येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे जीएसटीचे २४ हजार कोटी रूपये केद्राकडून येणे बाकी आहेत. मेघालय कोठे आणि महाराष्ट्र कोठे, पण महाराष्ट्राला कमी लेखण्याचे भाजपचे धोरणच ठरले आहे. पंतप्रधानांनी चक्रीवादळाबद्दल गुजरातला एक हजार कोटींची नुकसानभरपाई जाहीर केली. पश्चिम बंगाल, ओडीसालाही नुकसानभरपाई जाहीर केली, पण महाराष्ट्राला यातून वगळले. त्यामुळे संधी मिळेल तिथे ही मंडळी महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करणारा गजेंद्र पाटील म्हणजे दुसरा परमवीर सिंग आहे. केवळ आरोपामुळे अनिल देशमुखांसारख्या चांगल्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागला. खाकीतील हे दरोडेखोर हजारो कोटींची उलाढाल करतात. हे आधी गजाआड झाले पाहिजेत.
चौकट
● चंद्रकांत पाटील यांना मस्ती आली आहे. ते कोणावरही धमकीच्या भाषेत टीका करत आहेत. छगन भुजबळ जामीनावर सुटलेले आहात, अशी भाषा बोलले होते. आता अजितदादांवर बोलत आहेत. त्यांच्यावर एक व्यंग्यचित्र छापून आले आहे. झोपेत पंलगावरून खाली पडले तरी सरकार पडले, सरकार पडले, असे ते ओरडत आहेत, अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.