दूध उत्पादन घटले; शेतकरी अडचणीत
By Admin | Updated: September 3, 2015 23:53 IST2015-09-03T23:53:25+5:302015-09-03T23:53:25+5:30
पशुखाद्याचे दर गगनाला : जनावरे विकण्याची वेळ

दूध उत्पादन घटले; शेतकरी अडचणीत
संतोष बामणे - जयसिंगपूर बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम् सुफलाम बनला आहे. मुख्य पीक उसासह इतर सर्वच पिकांचे विक्रमी उत्पादन घेणारा येथील शेतकरी पशुधनातही आघाडीवर. मात्र, गेल्या आठवड्यापासून पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दुधाचे उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांना पशुधन विकण्याची वेळ येत आहे. तालुक्याला कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या चारही नद्यांनी वेढा दिल्याने शेती ओलिताखाली आहे. मुबलक पाणी, सुपीक जमीन अन् कष्टाची तयारी यातून येथील शेतकरी काळ्या आईच्या पोटातून सोने पिकवत आहे. मुख्य पीक उसाबरोबरच भाजीपाला, फळभाजी, द्राक्ष आदी पिकांचे विक्रमी उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे. आदर्शवत शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनातून दुग्ध व्यवसायातही आघाडीवर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चाऱ्याचे वाढलेले दर आणि पशुखाद्याचे दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ध्या चाराटंचाईबरोबर पशुखाद्याचे दरही वाढले आहेत. पन्नास किलो पोत्याचे सरकी पेंडचे ११८०, हरभरा कना ८७०, मकाचुनी८००, गोदण मिक्स ८५०, गहू भुसा ८५०, गोळी पेंड साठ किलोला १२००, कडबाकुट्टी ४०० रुपये असे दर वाढल्याने दुभत्या जनावरांना खाद्य द्यायचे कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. खाद्य दिले नसल्यामुळे दुधाचे उत्पादन घटत आहे. दुग्ध व्यवसायातून बेरजेचे गणित मांडणाऱ्या शेतकऱ्यांचे महागड्या चारा व पुशखाद्यामुळे गणितच चुकले आहे.
चाऱ्याचे दरही वाढले
सध्या पशुखाद्याचे वाढते दर, वैरण टंचाई व जनावरांच्या औषधाचा खर्च याचा हिशेब केला तर शेतकऱ्याला जनावरे परवडत नाहीत. दुधाला हमीभाव नसल्यामुळे दूध उत्पादकांच्या पदरात काहीच पडत नाही. यामुळे जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
- सुशांत मिरजे, दूध उत्पादक, चिंचवाड
शेतकरी जनावरे कमी करत असल्यामुळे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने दुभत्या जनावरांना खाद्य द्यावयाचे कमी केल्याने दुधामध्ये घट आली असून व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे.
- भूषण मगदूम,
दूध व्यावसायिक, उदगांव