व्यापाऱ्यांनो...बदला नाही तर संपाल !

By Admin | Updated: August 30, 2015 00:25 IST2015-08-30T00:25:08+5:302015-08-30T00:25:08+5:30

चकोर गांधी यांचा सल्ला : ‘लोकमत’ आणि ‘जितो’कडून व्याख्यानाचे आयोजन; नागरिकांची तुडुंब गर्दी

Merchants ... do not change if they do not! | व्यापाऱ्यांनो...बदला नाही तर संपाल !

व्यापाऱ्यांनो...बदला नाही तर संपाल !

कोल्हापूर : पूर्वीचा उद्योग आणि आत्ताचा उद्योग यांत कमालीचा बदल झाला आहे. भारताचा विचार करता आगामी वीस वर्षांचा काळ हा सुवर्णकाळ आहे. जुनी मानसिकता सोडून ग्राहकांशी दैनंदिन संवाद वाढवा आणि नफ्यापेक्षा ‘ब्रँड’वर लक्ष द्या. ब्रँड तयार करताना बदलांची मानसिकता ठेवा, असे आवाहन पुण्याचे प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ चकोर गांधी यांनी शनिवारी येथे केले.
राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘लोकमत’ आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन, कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने ‘सावधान! व्यवसाय बदलतोय’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख होते. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष नेमचंद संघवी, सचिव चंद्रकांत राठोड प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. या व्याख्यानास व्यापारी, उद्योजकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची तुडुंब गर्दी उसळली होती. समाजातील प्रत्येक घटक बदलासाठी कसा उत्सुक आहे, याचेच प्रत्यंतर त्यातून आले.
चकोर गांधी म्हणाले, ‘बदल हा निसर्गाचा नियम आहे. बाजारातील सध्याची स्पर्धा भविष्यात आणखी तीव्र होणार आहे. व्यापाऱ्यांनी आताची परिस्थिती न पाहता पुढील पाच वर्षांचा अभ्यास केला पाहिजे. माध्यमे, नवे तंत्रज्ञान, नव्या उत्पादनांचा मारा व विकास अशा विविध कारणांमुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. व्यवसायात झालेले हे बदल व्यापाऱ्यांना समजतात; पण त्यानुसार स्वत:मध्ये बदल करण्यात ते कमी पडतात. यापुढील काळ कसोटीचा आहे. त्यामुळे जे बदलतील तेच तग धरून राहतील.’
ते म्हणाले, ‘बाजारातील बदल आत्मसात करण्याची मानसिकता व्यापाऱ्यांनी ठेवली पाहिजे. तुम्ही बदला, नाही तर तुम्ही संपला, हे लक्षात घ्या. ग्राहकांपासून अलिप्त राहून धंदा करणे आता यापुढे शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम ग्राहकांच्या गरजा ओळखण्यासाठी त्यांच्याशी दैनंदिन संवाद वाढवा. गुणवैशिष्ट्ये शोधून स्वत:चा ‘ब्रँड’ तयार करा, जेणेकरून ग्राहकाचा विश्वास संपादन करता येईल. हे सर्व एकाच दिवशी शक्य होणार नाही.
पत्नीची सोबत घ्या...
या सर्व गोष्टी यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या पत्नीला आपल्यासोबत व्यवसायात घ्या. आता स्वत: खाण्याचे दिवस संपले. आता मिळून खाण्याचे दिवस आले आहेत. जर तुमचा कर्मचारी खुश असेल तरच तुमचा व्यवसाय वाढू शकतो, हे लक्षात घ्या. आपल्या दुकानाचा किंवा व्यापारी जागेचा व्यवस्थित वापर करा. ग्राहकांना अडचणीची ठरेल अशी कोणतीही गोष्ट करू नका. ग्राहकांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करा. या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असा सल्ला गांधी यांनी दिला.
मुलगा आणि व्यवसाय
डॉक्टरांचा मुलगा पदवी घेतल्यानंतरच डॉक्टर होतो. वकिलाचा मुलगा पदवी घेतल्यानंतरच वकील होतो. मात्र व्यापाऱ्याचे तसे नसते. त्याने ठरविले की तो एका रात्रीत व्यापारी होतो. हे चुकीचे आहे. बाबांनो, असे करू नका. आपल्या मुलग्याला व्यवसायाची मुळात आवड आहे का पहा. त्याला पारंपरिक व्यवसायात बदल करण्याची मोकळीक द्या. त्याच्या पाठीशी तुमचे अनुभव असू देत; मात्र तुमचे विचार त्याच्यावर लादू नका, असे गांधी यांनी सांगितले.
सभागृह हाऊसफुल्ल
प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ चकोर गांधी यांच्या व्याख्यानाबद्दल श्रोत्यांना उत्सुकता होती. त्यामुळे व्याख्यान ऐकण्यासाठी व्यापारी व विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांनी गर्दी केल्याने सभागृह हाऊसफुल्ल झाले.
स्वास्थ्य जपा
गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीपासून उपस्थितांशी उत्तम संवाद साधला. व्याख्यानात सर्वांना सहभागी करून घेतल्याने त्याची परिणामकारता वाढली. पैसा जरूर कमवा; मात्र तो कमविताना परिवाराकडे लक्ष द्या. आपले स्वास्थ्य जपा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
काळाशी स्पर्धा करणारा ‘लोकमत’
लोकमत असे वृत्तपत्र आहे, की जे काळानुसार बदलत आहे. लोकांना काय हवे आहे हे लोकमत वृत्तपत्र समूह अचूकपणे आत्मसात करीत आहे व त्यानुसार बदल करीत असल्यानेच ‘लोकमत’ची चौफेर घोडदौड सुरू असल्याचे गांधी यांनी सांगितले.
संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. ‘लोकमत सखी मंच’च्या समन्वयक प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Merchants ... do not change if they do not!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.