जेवणाचे बिल खानसाम्याला परत देणारा मंत्री देशमुख आबांच्या आठवणी : विविध लढ्यांत होते अग्रभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:57+5:302021-08-01T04:22:57+5:30

कोल्हापूर : ही गोष्ट साधारणत: २००० सालातील..तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे पणनमंत्री होते. ...

Memories of Minister Deshmukh Ab, who returned the meal bill to Khansamya: He was at the forefront of various battles | जेवणाचे बिल खानसाम्याला परत देणारा मंत्री देशमुख आबांच्या आठवणी : विविध लढ्यांत होते अग्रभागी

जेवणाचे बिल खानसाम्याला परत देणारा मंत्री देशमुख आबांच्या आठवणी : विविध लढ्यांत होते अग्रभागी

कोल्हापूर : ही गोष्ट साधारणत: २००० सालातील..तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे पणनमंत्री होते. कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामगृहात त्यांना भेटण्यासाठी ‘शेकाप’सह अनेक पक्षांचे कार्यकर्ते आले होते. दौरा संपवून मुंबईकडे जाताना, त्यांनी तेथील खानसामाला रजिस्टर घेऊन बोलावले. त्यामध्ये जेवढे चहा-पाणी, जेवण झाले त्याचे पैसे दिले. त्याचबरोबर माझ्या दौऱ्यामुळे आणखी कोणी जेऊन गेले असेल तर तेही घे. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांकडून याचे पैसे घ्यायचे नाहीत, असे बजावले. आपल्या जेवणाचे पैसे स्वत: मंत्रीच बोलावून देत असल्याचे पाहून खानसामाही अवाक्‌ झाला..असा मंत्री महाराष्ट्राने पुन्हा पाहिला नाही. देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या चारित्र्याच्या आठवणी शनिवारी पुन्हा ताज्या झाल्या. असा एखादा आमदार, मंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेला असा विश्वास पुढील पिढी ठेवणार नाही इतके मोठेपण त्यांनी वागणुकीतून दाखवून दिले.

‘शेकाप’चे दिवंगत नेते गणपतराव देशमुख आणि कोल्हापूर यांचे नाते खूप वेगळे आहे. डाव्या विचाराच्या प्रवासात त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यासह कोल्हापुरात झालेल्या कष्टकरी, श्रमजीवी लोकांच्या आंदोलनात अग्रभागी राहिले. सीमा लढ्याच्या आंदोलनात ते उभे राहिलेच, त्याशिवाय विधिमंडळात सर्वांत अधिक आक्रमकपणे त्यांनी सीमा बांधवांच्या भावना मांडल्या. देशमुख विविध आंदोलनांसाठी कोल्हापुरात येत होते. मात्र, ३१ जानेवारी २०२० ला ‘शेकाप’च्या वतीने ७५ वर्षे निष्ठेने पक्षात असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार देशमुख यांच्या हस्ते होता. त्यासाठी ते शेवटचे कोल्हापुरात आले होते.

‘खावटी’ कर्ज माफ करणारे कृषिमंत्री

गणपतराव देशमुख यांचे आयुष्यच कष्टकऱ्यांच्या लढ्यासाठी गेले. ज्या-ज्या वेळी सत्तेची संधी मिळाली, त्या-त्या वेळी त्यांनी उठावदार काम केले. १९७८ ला ते कृषिमंत्री असताना विकास संस्थांच्या पातळीवर शेतकऱ्यांनी उचल केलेल्या १५३ कोटींचे खावटी कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

-----------

शेकापचा विचार व्यक्तीरूपाने त्यांच्यामध्ये होता. हा विचार कशा पद्धतीने अमलात येतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख होते. राजकारणात पदे मिळविण्यास विचार व तत्त्वज्ञान गहाण ठेवून कधी काही केले नाही. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतही ते आले असते. मात्र, तत्त्वज्ञान सोडून काही केले नाही, अशी माणसे फार दुर्मीळ होत आहेत. त्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न आम्ही केला.

- संपतराव पवार

माजी आमदार शेकाप, कोल्हापूर

Web Title: Memories of Minister Deshmukh Ab, who returned the meal bill to Khansamya: He was at the forefront of various battles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.