नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST2021-09-15T04:27:54+5:302021-09-15T04:27:54+5:30

नीट परीक्षेवर लक्ष केंद्रित केल्याने बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना कमी मिळतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच १५ ...

Medical admission without proper payment; Expert, what do students think? | नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

नीट परीक्षेवर लक्ष केंद्रित केल्याने बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना कमी मिळतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच १५ टक्के कोट्यातून प्रवेश घेताना पुन्हा विद्यार्थ्यांना नीट द्यावी लागणार आहे. केवळ नीट परीक्षेवर लक्ष देऊन ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, त्यांनी याचिका दाखल केल्यास प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याचा धोका आहे. तामिळनाडूप्रमाणे इतर राज्यांनी अनुकरण केल्यास नीट परीक्षेला अर्थ राहणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बारावीतील गुणांच्या आधाराऐवजी ‘नीट’ परीक्षेद्वारेच वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे मत प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शक, समुपदेशकांनी व्यक्त केले.

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

राज्यातील विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेने संमत केले. या विधेयकामुळे सरकारी आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांवर बारावी परीक्षेतील गुणांच्याआधारे प्रवेश मिळणार आहे.

धक्कादायक निर्णय

बारावीच्या गुणांच्या आधारे मेडिकलला प्रवेश देण्याचा राज्यांना अधिकार आहे. तामिळनाडूपूर्वी आंध्रप्रदेश, तेलंगणा, जम्मू-काश्मीर राज्याने असा निर्णय घेतला होता. तेलंगणा, आंध्रप्रदेशने हा निर्णय रद्द करून नीट परीक्षा स्वीकारली आहे. माझ्या मते तामिळनाडूने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्याचे अन्य राज्यांनी अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. सर्व राज्यांनी ‘नीट’प्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविणे विद्यार्थी हिताचे आहे.

- अशोक शेट्टी, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक

देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेवर आणि पारदर्शकपणे व्हावी, या उद्देशाने नीट परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे बारावीतील गुणांवर प्रवेश देणे योग्य ठरणार नाही. ज्या राज्यांना नीट नको आहे, त्यांनी किमान सीईटी, तरी घेतली पाहिजे.

-रितेश दलाल, नीट परीक्षेचे मार्गदर्शक

विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

हा एक चांगला निर्णय आहे. परंतु वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असलेला अचूक अभ्यास किंवा थोडे मूलभूत जे सीबीएसई अभ्यासक्रमाद्वारे प्राधान्य दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांनी राज्य बोर्ड आणि सीबीएसई अभ्यासक्रमामधून अभ्यास केला आहे, त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची समान संधी मिळते. माझे मत नीट परीक्षा असावी. या परीक्षेमुळे देशातील सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशाची समान संधी मिळते.

- कस्तुरी केसरकर

वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जाते. त्याची तयारी दोन ते अडीच वर्षे विद्यार्थी करतात. त्यामुळे ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. कोरोनामुळे बारावीची अंतिम लेखी परीक्षा झालेली नसल्याने ‘नीट’द्वारेच प्रवेश व्हावेत.

- आयुष कदम

Web Title: Medical admission without proper payment; Expert, what do students think?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.