‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली मेख

By Admin | Updated: July 6, 2015 00:28 IST2015-07-05T23:43:00+5:302015-07-06T00:28:56+5:30

मच्छिंद्र सकटे : दलित महासंघाचा मेळाव्यात मोदी, फडणवीस सरकारवर टीका

Mech in the name of Make in India | ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली मेख

‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली मेख


कोल्हापूर : ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’च्या नावाखाली मोदी आणि फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या हितालाच मेख मारली आहे. आज हिंदू राष्ट्रवादामुळे शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मागे पडले आहेत. दलितांवरील अत्याचार वाढल्यामुळे हिंदू राष्ट्रवादाला रोखण्यासाठी दलित महासंघाने तीव्र संघर्षाचा निर्धार केल्याचे महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले.दलित महासंघाच्या २४ व्या वर्धापनदिनी रविवारी येथील शाहू स्मारक भवनात निर्धार मेळाव्यात अध्यक्षस्थावरून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी भटक्या-विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने उपस्थित होते.डॉ. सकटे म्हणाले, आरएसएस आजही आपले कर्मठ विचार सोडायला तयार नाही. स्वत:मध्ये बदल घडवून न आणणाऱ्यांचे सरकार देशामध्ये कसे बदल घडविणार? गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गोरगरिबांचे आर्थिक नुकसान होत आहे. मराठ्यांना व मुस्लिमांना आरक्षणापासून डावलले जात आहे; पण याविरोधात कुणीच काही बोलत नाहीत. पूर्वी लोक अडाणी, अंधश्रद्धाळू व गरीब होते; पण ते नेता चांगला निवडत होते. आज लोक सुशिक्षित झाले पण नेता अडाणी, अशी परिस्थिती आहे. शाहू-फुले-आंबेडकर आणि अण्णा भाऊंचे विचार ही आमची शिदोरी असल्याचे डॉ. सकटे यांनी सांगितले.लक्ष्मण माने म्हणाले, गरीबांच्या संघटना बांधणे आज कठीण झाले आहे. कार्यकर्तेच दलाल झाल्यामुळे पुरोगामी चळवळ धोक्यात आहे. आमिषापोटी तरुणांना वेगळ्या वाटेवर नेले जात आहे. हे रोखण्यासाठी तरुणांना चळवळीत संधी दिली पाहिजे. दलित संघटनांनी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवरही लढावे. प्रतिगामी शक्तींची सत्ता केंद्रात असल्यामुळे पुरोगामी गटातील सर्व जातिसमूहांनी एकत्रित येऊन लढा उभारला तरच टिकाव लागणार आहे. डॉ. गुरव म्हणाले, आपण अहंकार सोडत नाही तोपर्यंत जातिव्यवस्था तशीच राहील. जातियवादी ‘आरएसएस’चा लोकशाही मार्गाने पराभव करण्यासाठी पुढे या. सर्वजण एकत्र आले तर या प्रतिगाम्यांची सत्ता उलथवून टाकणे अशक्य नाही. दारिद्र्य, विषमता, अंधश्रद्धा, अनारोग्य, व्यसन संपले तरच बहुजनांची प्रगती होईल. जिल्हाध्यक्ष लालासो नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दबडे, बाबूराव आयवाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पुष्पलता सकटे, अनिल मिसाळ, अजित भोरे, सुरेश महापुरे, आदी उपस्थित होते. प्रा. अमोल महापुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

आठवले यांच्याकडून
दलित कविता बदनाम
दलित कविता रामदास आठवलेंनी बदनाम केली. ल ला ल आणि ट ला ट जुळवून संसदेत कविता करण्याची काय गरज आहे? अशा वृत्तीमुळे आंबेडकरी चळवळ पुढे जाणार नाही. आंबेडकरवादी चळवळीत काम करताना अशा पद्धतीने व्यक्त होणे चुकीचे आहे, अशी टीका लक्ष्मण माने यांनी केली.

गुडसा आंदोलन
गोवंश हत्याबंदी कायदा करून फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या तोंडचा घासच काढून घेतला आहे. याला विरोध करण्यासाठी दलित महासंघातर्फे गुडसा आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. सकटे यांनी दिला.

Web Title: Mech in the name of Make in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.